भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पालांदूर : येथील बाजार चौकातून गेलेल्या दिघोरी-पालांदूर-अड्याळ व पालांदूर-मानेगाव या रस्त्यांवरील पार्किंगची समस्या भेडसावत आहे. मिळेल त्या जागी अन मिळेल तिथे वाहनांचे पार्किंग होऊ लागले आहे .मात्र थेट भर चौकात रस्त्यावरच दुतर्फा वाहनाचे पार्किंग होत असल्याने अनेक समस्या निर्माण होत आहेत.या समस्येकडे स्थानिक प्रशासन सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. पालांदूर गावात दिवसेंदिवस वाहनांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात भर पडत आहे.त्यामुळे बाजार चौकात असलेल्या दुकानांसमोर अनेक दुचाकी व चारचाकी वाहने पार्क केलेली असतात.तर,त्यापुढे मानेगाव मार्गावर खासगी प्रवासी बसेससह अवजड वाहने व तीन चाकी आॅटो रिक्षा पार्क करण्यात येतात.
यामुळे अध्यार्हून अधिक रस्ता व्यापला जातो.परिणामी,इतर वाहन चालकांना त्यातून कसाबसा मार्ग काढावा लागतो.अगदी सकाळच्या रहदारीच्या वेळी अशाप्रकारे बेशिस्त पार्क केलेल्या वाहनांमुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. कित्येक लोकांना या अपघातामध्ये जायबंदी व्हावे लागले असून अनेकजण या मार्गावर या अवैद्य पार्किंगच्या समस्येमुळे जखमी झाले आहे या गंभीर समस्येकडे स्थानिक ग्रामपंचायत, लोकप्रतिनिधी, सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलिस प्रशासनाच्या वाहतूक विभागाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. वारंवार तोंडी तक्रारी करूनहीअद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.एखादी दुदैवी घटना घडल्यावरच प्रशासन जागे होणार का? असा संतप्त सवाल पालक व सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.