भंडारा पत्रिका/प्रतिनिधी पालांदूर : पर्यावरणाचा समतोल राखण्याकरिता झाडे लावा झाडे जगवा ही मोहीम राबविण्याकरिता शासन दरबारातून लाखो रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्या जातो. परंतु वृक्ष लागवडीचे योग्य ते संगोपन होत नाही.याचे ज्वलंत उदाहरण पालांदूर-मानेगाव मार्ग ठरत आहे.या मार्गावर अनेक वेळा वृक्ष लागवड करून देखील योग्य संगोपनाअभावी आज रोजी केवळ वृक्षांचे उघडे सुकलेले अवशेष दृष्टीस पडत आहेत. यावरून वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट केवळ शासनाच्या निधीचा अपव्यय व देख- ावा असल्याचे दिसून येत आहे.
लाखनी तालुक्यातील पालांदूर- मानेगाव मार्गाचे रुंदीकरण व नूतनीकरण करण्याकरिता अनेक लहान मोठ्या वृक्षांची कत्तल करण्यात आली. रस्ता रुंदीकरण व नव्याने झालेल्या डांबरीकरणामुळे प्रवाशांना तसेच वाहन चालकांनासुखद अनुभव देत आहे.सदर मार्गावरील सौंदर्यात भर पडावी, तसेच तुटलेल्या वृक्षांची भरपाई व्हावी म्हणून दोन्ही बाजूने शेकडो वृक्षांची लागवड करण्यात आली होती.परंतु संगोपन करण्याची दृष्टी अपुरी पडल्यामुळे मोजकेच वृक्ष आज रोजी डोलताना दिसत आहेत. त्यामुळे पुन्हा वृक्ष लागवड करून भर टाकण्यात आली.परंतु त्यांना योग्य सुरक्षा कवच न लावल्यामुळे तसेच उन्हाळ्यात पाण्याचा थंडावा न मिळाल्यामुळे अनेक वृक्षांनी माना टाकल्या.त्यामुळे आज रोजी केवळ वृक्षांचे सुकलेले अवशेष संबंधित विभागाच्या कार्यक्षमतेचा परिचय करून देत असल्याचे वास्तव या मार्गावरून प्रवास करताना निदर्शनास येत आहे.