भंडारा पत्रिका/प्रतिनिधी दिघोरी मोठी : आर्थिक परिस्थिती हलाखीची, आई-वडील शेतमजूर, शिक्षणाच्या वाटेवर पदोपदी अडचणी आणि त्यात दहावीच्या परीक्षेत गणित विषयात आलेले अपयश… मात्र या प्रतिकूल परिस्थितीसमोर न झुकता जिद्द, चिकाटी आणि अथक मेहनतीच्या बळावर दिघोरी मोठी येथील नितेश शामराव गोटेफोडे याने अखेर शिक्षक होण्याचे स्वप्न साकार केले. त्याचा हा संघर्षमय प्रवास आज अनेक गरीब व प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांसाठी प्रेरणेचा दीप ठरत आहे. अत्यंत सामान्य कुटुंबात जन्मलेल्या नितेशच्या शिक्षणाचा प्रवास सुरुवातीपासूनच संघर्षमय राहिला.
आई-वडील शेतमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असताना मुलाच्या शिक्षणासाठी त्यांनी घेतलेले कष्ट नितेशने जवळून पाहिले. आर्थिक अडचणी असूनही त्यांनी त्याच्या शिक्षणाला कधीही खीळ बसू दिली नाही. मात्र दहावीच्या परीक्षेत गणित विषयात अपयश आल्याने त्याच्या शैक्षणिक प्रवासाला मोठा धक्का बसला. अनेक विद्यार्थी अशा अपयशानंतर निराश होऊन शिक्षणाचा मार्ग सोडतात; परंतु नितेशने अपयशाला शेवट न मानता पुन्हा उभे राहण्याची संधी मानली.
गणित विषयावर विशेष मेहनत घेत त्याने पुढील शिक्षण सुरू ठेवले. परिस्थिती कितीही कठीण असली तरी ध्येय सोडायचे नाही, असा निर्धार त्याने मनाशी पक्का केला. ‘परिस्थिती गरीब असली तरी स्वप्ने गरीब नसावीत’ या विचाराने प्रेरित होत नितेशने शिक्षक होण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवले. सातत्यपूर्ण अभ्यास, कठोर परिश्रम आणि स्वत:वरील विश्वासाच्या जोरावर त्याने आपल्या ध्येयाकडे वाटचाल सुरू ठेवली. अनेक अडथळे आले, पण प्रत्येक अडचणीने त्याची जिद्द अधिकच मजबूत केली. अखेर त्याने शिक्षक पद मिळवत आपल्या संघषार्ला यशाची किनार दिली. आपल्या यशाचे श्रेय देताना नितेश म्हणतो, ‘माज्या यशामागे माज्या आईवडिलांची मोठी मेहनत आणि त्याग आहे.
गुरुजनांनी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन तसेच मित्रपरिवाराने दिलेले सहकार्य आणि प्रोत्साहन यामुळे मला जिद्दीने मेहनत करण्याची प्रेरणा मिळाली. त्यामुळेच आज मी माझे ध्येय गाठू शकलो.’ दहावीत एका विषयात नापास झालेला विद्यार्थी पुढे शिक्षक होतो, हीच नितेशच्या जिद्दीची खरी ताकद आहे. त्याचे यश केवळ एका तरुणाचे यश नसून, ‘अपयश आले म्हणून थांबू नका; परिस्थिती कितीही कठीण असली तरी प्रयत्नांची साथ सोडू नका’ असा संदेश देणारी प्रेरणादायी कहाणी आहे. नितेशच्या या उल्लेखनीय यशाबद्दल कुटुंबीय, मित्रपरिवार, गुरुजन आणि ग्रामस्थांकडून त्याचे अभिनंदन होत असून, त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत. गरिबी ही स्वप्नांची मर्यादा नसते, तर जिद्द आणि मेहनत असेल तर प्रतिकूल परिस्थितीतूनही यशाची नवी वाट निर्माण करता येते, हे नितेशने आपल्या कर्तृत्वातून सिद्ध केले आहे.