भंडारा पत्रिका / प्रतिनिधी खापा/तुमसर : तुमसर तालुका सरपंच संघटना व ओबीसी बांधवांच्या वतीने देशाच्या आगामी जनगणनेत ओबीसी प्रवर्गाची स्वतंत्र नोंद करण्यासाठी स्वतंत्र कॉलम तसेच ‘ड्रॉप-डाउन मेनू’ ची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तहसीलदार, तुमसर यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले. ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजकुमार माटे व माजी प्राचार्य अनंतलाल दमाहे यांच्या नेतृत्वात हे निवेदन सादर करण्यात आले. जनगणनेच्या सर्वेक्षणामध्ये ओबीसी प्रवगार्साठी स्वतंत्र कॉलम नसल्याने या समाजाची स्वतंत्र व अचूक नोंद होणे आवश्यक असल्याची भूमिका यावेळी मांडण्यात आली. केंद्र सरकारने तात्काळ जनगणनेच्या सध्याच्या सर्वेक्षण प्रश्नावलीत आवश्यक दुरुस्ती करून ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम व स्वतंत्र नोंदीसाठी ‘ड्रॉप-डाउन मेनू’ ची अंमलबजावणी करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
या मागणीचा तातडीने व सकारात्मक विचार करण्यात आला नाही, तर येत्या ५ सप्टेंबरपासून देशभरातील ओबीसी समाज रस्त्यावर उतरून तीव्र जनआंदोलन छेडेल, असा इशारा देण्यात आला. तसेच मागणी मान्य न झाल्यास आगामी जनगणनेवर बहिष्कार टाकण्याची वेळ येऊ शकते, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या प्रश्नावरून देशात कोणतीही प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी केंद्र सरकारची राहील, याची गांभीयार्ने नोंद घ्यावी, अशी मागणीही ओबीसी बांधव व सरपंच संघटनेच्या वतीने करण्यात आली. यावेळी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजकुमार माटे, सरपंच संघटनेचे अध्यक्ष देवेंद्र मेश्राम, माजी प्राचार्य अनंतलाल दमाहे, पारस भुसारी, पंकज पारधी, नामदेव राहगडाले, पवन खवास, प्रीती सोनवणे, प्रतिमा दुर्वे, नरेंद्र ठाकरे, सुरेंद्र वहिले, दिनेश उचीबघेले, मंगेश मानापुरे, हेमंत बांते, गोपीचंद बावनकर, संजय टेंबरे, नामदेव हटवार, पत्रकार नाना ठवकर, पत्रकार काका भोयर, संजय माटे, बालू करंडे यांच्यासह ओबीसी समाजाचे व सरपंच संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.