भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदूर : सामाजिक कार्यकर्ते व पर्यावरण अभ्यासक सोनम वांगचुक यांच्यावरील कारवाईच्या निषेधार्थ समता सैनिक दलाच्या वतीने भारताच्या राष्ट्रपतींना निवेदन सादर करण्यात आले. लोकशाही हक्कांचे संरक्षण, शांततापूर्ण आंदोलनावरील कारवाईची निष्पक्ष चौकशी तसेच कथित पेपर लीक प्रकरण आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या घटनांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. भारतीय संविधान प्रत्येक नागरिकाला शांततापूर्ण आणि लोकशाही मागार्ने आंदोलन करण्याचा अधिकार प्रदान करते. सोनम वांगचुक यांनी नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे कथित पेपर लीक प्रकरण, विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या घटनांची चौकशी आणि शिक्षण व्यवस्थेत उत्तरदायित्व निश्चित करण्याच्या मागण्यांसाठी उपोषण सुरू केले होते.
मात्र, त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा करण्याऐवजी दिल्ली पोलिसांनी त्यांना आंदोलनस्थळावरून रुग्णालयात हलविल्याचा आरोप करण्यात आला आहे. समता सैनिक दलाने राष्ट्रपतींकडे या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र, निष्पक्ष व वेळबद्ध चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच आंदोलनकर्त्यांवरील कारवाईची घटनात्मक व कायदेशीर समीक्षा, कथित पेपर लीक प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई, विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या घटनांची सखोल चौकशी आणि जबाबदार अधिकाºयांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी रोशन फुले, खुशाल बोरकर, युवराज सुखदेवे, वनमाला सुखदेवे, गीता जांभूळकर, माधुरी जांभूळकर, सलमा मेश्राम, मैपाल सूर्यवंशी, सौरभ नंदेश्वर, राहुल राऊत, कृष्णा सूर्यवंशी, सुदर्शन रामटेके, कन्हैयालाल जांभूळकर, प्रल्हाद सूर्यवंशी, रोशन सोनटक्के, वैभव वैद्य, झकास फुल्लुके आणि इतर सहकारी उपस्थित होते.