भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : राज्यातील १३ कोटी जनतेच्या सुरक्षेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार कार्यरत असून, त्यामध्ये विरोधकांचाही समावेश आहे. त्यामुळे कायदे हे कोणत्याही व्यक्ती किंवा पक्षाविरोधात नसून सर्वसामान्य नागरिकांच्या संरक्षणासाठी आहेत, असे प्रतिपादन आमदार डॉ. परिणय फुके यांनी विधानपरिषदेत केले. भारतीय नागरी सुरक्षा संहिता, २०२३ मधील प्रस्तावित सुधारणांवरील चर्चेदरम्यान बोलताना त्यांनी विरोधकांनी उपस्थित केलेल्या शंका व आरोपांचे सडेतोड खंडन केले. “नवीन कायदा आला की तो आमच्याविरोधातच आहे, असा गैरसमज विरोधक करून घेतात. प्रत्यक्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षेसाठी काम करतात आणि त्यामध्ये विरोधकांच्याही सुरक्षेची जबाबदारीसरकारचीच आहे,” असे ते म्हणाले.
डॉ. फुके यांनी सांगितले की, राज्यात कायद्याचा दुरुपयोग कधीही झाला नाही आणि होणारही नाही. गुन्हेगारीवर नियंत्रण, नागरिकांची सुरक्षितता आणि आधुनिक स्वरूपातील गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी हे कायदे आवश्यक आहेत.विरोधकांकडून सरकारविरोधात खोटे कथानक (फेक नॅरेटिव्ह) तयार करण्याचा प्रयत्न होत असल्याचाही त्यांनी आरोप केला. नक्षलवादाविरोधातील कारवाईचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, गोंदिया-गडचिरोली परिसरातील सुमारे ८० टक्के नक्षलवाद संपुष्टात आला असून उर्वरित नक्षलवाद्यांनीही आत्मसमर्पणाचा मार्ग स्वीकारला आहे. केंद्रीय गृहमंत्री आदरणीय अमित शहा आणि मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या प्रभावी नेतृत्वामुळे देशातील मोठ्या कारवाया यशस्वी झाल्या असल्याचे त्यांनी नमूद केले. भाजपवर “भाजप सुरक्षा संहिता” आणल्याचा आरोप करणाºयांनाही त्यांनी प्रत्युत्तर देताना सांगितले की, “भाजप हा देशातील सर्वात मोठा पक्ष आहे. आम्हाला कोणाचा पक्ष संपविण्यासाठी कायद्याची गरज नाही. विरोधी पक्षांमध्येच एकमेकांना संपविण्याची स्पर्धा सुरू आहे.”