
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया:- गोंदिया शहरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने दोन टप्प्यांमध्ये भूमिगत गटार योजनेचे काम सुरू आहे. मात्र पावसाळा सुरू झाल्याने या कामामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यांवरील खोदकाम, जागोजागी पडलेले खड्डे यामुळे वाहने फसणे आणि अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेचे अध्यक्ष सचिन शेंडे यांनी तातडीने पावले उचलली आहेत. आज महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व संबंधित विभागाच्या अधिकाºयांसोबत बैठक घेऊन नगराध्यक्ष सचिन शेंडे यांनी पावसाळा संपेपर्यंत भूमिगत गटार योजनेचे पुढील सर्व काम बंद ठेवण्याचे आदेश दिले. पावसाळ्यात खोदकाम केल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असून अपघातांची शक्यता वाढते, याची गंभीर दखल त्यांनी घेतली.
यासोबतच शहरात ज्या ठिकाणी खोदकाम करण्यात आले आहे, तेथील खड्डे व रस्ते येत्या पंधरा दिवसांत कॉंक्रिटीकरण करून पूर्ण आले. संबंधित कंत्राटदाराने दिलेल्या मुदतीत काम पूर्ण न केल्यास किंवा आदेश धुडकावून शहरात कुठेही नवीन खोदकाम सुरू केल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्याची ताकीदही नगराध्यक्षांनी दिली आहे. भूमिगत गटार योजनेचा पहिला टप्पा ९५ टक्के पूर्ण झाल्याचा प्रत्यक्षात शहरात अनेक ठिकाणी काम अपूर्ण आहे. दुसºया टप्प्याचे २३५ कोटींचे काम प्रशासक काळात मंजूर झाले होते. या योजनेच्या निकृष्ट कामाबाबत नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. नळ जोडणीचे काम अद्याप सुरू झालेले नाही. नगराध्यक्ष सचिन शेंडे म्हणाले की, “पावसाळ्यात नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी हा निर्णय घेतला आहे. ही योजना महाराष्ट्रातील इतर शहरांमध्येही अयशस्वी ठरली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेला आमचे प्राधान्य आहे.” पावसाळ्यानंतर कामाच्या दर्जाची पुन्हा पाहणी करून पुढील निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. या निर्णयामुळे गोंदियाकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे.