भंडारा पत्रिका/प्रतिनिधी
भंडारा : भंडारा तालुक्यातील श्रीनगर (पोस्ट पहेला) येथील ३२ वर्षीय युवकाने वैनगंगा नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कारधा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद (मर्ग दाखल) करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुभम प्रमोद चवळे (वय ३२, रा. श्रीनगर, पोस्ट पहेला, ता. व जि. भंडारा) यांनी १६ जुलै रोजी दुपारी सुमारे १२ वाजल्यापासून ते १८ जुलै रोजी सकाळी साडेसातच्या दरम्यान कोणत्यातरी मानसिक तणावातून जीवनाला कंटाळून वैनगंगा नदीत उडी घेत आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
या घटनेबाबत सोपान डोमाजी सार्वे (वय ३९, रा. श्रीनगर, पोस्ट पहेला) यांनी कारधा पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून मर्ग क्रमांक ३७/२०२६ भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ अन्वये नोंदविण्यात आला आहे.
घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, युवकाने आत्महत्या कोणत्या कारणामुळे केली याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेंडे करीत आहेत.