भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पुणे : राज्यातील एकल मातांच्या मुलांची अचूक नोंद करून शासनाच्या सर्व सुविधा, योजनांचा लाभ मिळण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने पुढाकार घेतला आहे. या विद्यार्थ्यांना शिक्षण संस्थांमध्ये आवश्यक शैक्षणिक सुविधा, वसतिगृहात प्रवेश आण स्वतंत्र समुपदेशन यंत्रणा उभी करण्यासाठी समिती नियुक्त करण्यात आली आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाने या बाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले. राज्यात उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे सद्य:स्थितीत १४ हजार ६३३ एकल मातांच्या मुलांची नोंद उपलब्ध आहे. अनेक महाविद्यालयांत एकल मातांच्या मुलांची एकही नोंद नसल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यातील महाविद्यालये, उच्च शिक्षण संस्थांतील एकल मातांच्या मुलांची अचूक नोंद करणे आवश्यक आहे. त्यासाठी समिती नियुक्त करण्याचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतला आहे.
एकल मातांच्या मुलांची अचूक संख्या काढण्यासाठी उपाययोजना सुचविणे, शिक्षण संस्थांमध्ये आवश्यक शैक्षणिक सुविधा, वसतिगृहात प्रवेश आणि विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र समुपदेशन यंत्रणा उभी करण्यासाठी उपाययोजना सुचवणे अशी समितीची कार्यकक्षा निश्चित करण्यात आली आहे. समितीत एचएसएनसी समूह विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. हेमलता बागल यांच्या अध्यक्षतेखालील समितीमध्ये मुंबईच्या शासकीय विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अस्मिता वैद्य, हाशु अडवानी कॉलेज आॅफ स्पेशल एज्युकेशनच्या प्राचार्य डॉ. अस्मिता हुद्दार, डॉ. प्रतिभा जाधव, डॉ. परवीन सय्यद,निलिमा मिश्रा, प्राजक्ता कुलकर्णी, अमृता देगावकर हे सदस्य म्हणून काम पाहतील. उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालक डॉ. अर्चना बोºहाडे या सदस्य सचिव आहेत. नवीन शैक्षणिक वर्ष नुकतेच सुरू झाले असल्याने समितीने आपला सविस्तर अहवाल १५ दिवसात संचालनालयास सादर करावा, अशा सूचना उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी समितीला दिल्या आहेत.