कर्तव्य बजावताना अस्वलाच्या हल्ल्यात वनरक्षक श्यामू शरणागतांचा मृत्यू; मलपुरीवर शोककळा, वनकर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
● कारगिल युद्धात देशासाठी लढले… वनसंरक्षण करताना प्राणांची आहुती
● वनरक्षकासोबत एकच वनमजूर असल्याने सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
● शासनाच्या सुरक्षा धोरणाचा फेरआढावा घेण्याची सर्व स्तरांतून मागणी
नाजीम पाशाभाई
साकोली, दि. ६ : देशाच्या सीमारेषेवर कारगिल युद्धात शत्रूशी लढलेला एक धाडसी जवान… सैन्यातील १८ वर्षांची गौरवशाली सेवा पूर्ण करून वनसंरक्षणासाठी स्वतःला वाहून घेतलेला एक कर्तव्यदक्ष वनरक्षक… आणि अखेर जंगलात गस्त घालताना अस्वलाच्या हल्ल्यात वीरमरण! नवेगाव–नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रातील नागझिरा ब्लॉक अंतर्गत उमरझरी वनपरिक्षेत्रातील बंदरझरा बिटमध्ये बुधवारी सायंकाळी घडलेल्या या दुर्दैवी घटनेने संपूर्ण राज्यातील वनकर्मचारी हादरले असून वनरक्षकांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मूळचे तिरोडा तालुक्यातील मलपुरी येथील श्यामू महागू शरणागत (४५) यांनी १९९९ मध्ये भारतीय सैन्याच्या १६ मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये भरती होऊन कारगिल युद्धात सहभाग घेतला. तब्बल १८ वर्षे देशसेवा केल्यानंतर २०१८ मध्ये ते वन विभागात रुजू झाले. गेली सात वर्षे ते वन विभागात कार्यरत असून सध्या ते नागझिरा येथील सर्रा गेट अंतर्गत उमरझरी झोनमध्ये वनरक्षक म्हणून कार्यरत होते.
बुधवारी दुपारी सुमारे अडीच वाजता ते घरून कर्तव्यावर रवाना झाले. बंदरझरा परिसरात वनमजूर प्रशांत चौधरी (२५) यांच्यासह गस्त घालत असताना झुडपात बछड्यांसह दबा धरून बसलेल्या अस्वलीने अचानक हल्ला चढविला. शरणागत अस्वलीच्या पंजात सापडले. त्यांना सोडविण्याचा प्रयत्न करताना प्रशांत चौधरी किरकोळ जखमी झाले. त्यांनी तत्काळ आरडाओरड करून गावकरी व वन अधिकाऱ्यांना माहिती दिली; मात्र मदत पोहोचेपर्यंत अस्वलीने शरणागत यांना गंभीर जखमी केले होते. त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यानंतर अस्वली बछड्यांसह जंगलात निघून गेली.
घटनेनंतर वन अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थांनी घटनास्थळ गाठून मृतदेह तिरोडा येथील शासकीय रुग्णालयात पाठविला. गुरुवारी मलपुरी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी भूमेश्वरी, मुलगी सानिया (१९) आणि मुलगा पूरब (१६) असा परिवार आहे. कारगिल योद्धा आणि कर्तव्यदक्ष वनरक्षकाला अखेरचा निरोप देताना संपूर्ण गाव अश्रूंनी व्याकूळ झाले होते.
दरम्यान, नवेगाव–नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे दोन ब्लॉक झाल्यानंतर नागझिरा भागात गस्तीसाठी प्रत्येक वनरक्षकासोबत केवळ एकच वनमजूर उपलब्ध करून दिला जात असल्याची चर्चा वनकर्मचाऱ्यांमध्ये आहे. काही कर्मचाऱ्यांनी नवेगाव ब्लॉकमध्ये दोन वनमजूर तर नागझिरा ब्लॉकमध्ये एकच वनमजूर असल्याबाबत प्रश्न उपस्थित करत या व्यवस्थेचा फेरविचार करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात वन प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.
वनकर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, व्याघ्र प्रकल्पासारख्या अतिसंवेदनशील क्षेत्रात कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांना आधुनिक संरक्षण साहित्य, पुरेसे मनुष्यबळ, उच्च दर्जाची संपर्क व्यवस्था, जीपीएस, आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा आणि नियमित प्रशिक्षण देणे अत्यावश्यक आहे. अन्यथा अशा दुर्दैवी घटनांची पुनरावृत्ती होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
◼️ सरपंच राजेश ठाकूर यांची प्रतिक्रिया
“कारगिल युद्धात देशासाठी लढलेला आणि गावाचा अभिमान असलेला श्यामू शरणागत आज आपल्यात नाही, ही मलपुरीसाठी अत्यंत वेदनादायी घटना आहे. शासनाने त्यांच्या कुटुंबाला न्याय देतानाच वनकर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात.”
◼️ माहेश्वरी नेवारे (जिल्हाध्यक्षा, भाजपा महिला आघाडी)
“वनरक्षकांसोबत दोन वनमजूर देण्याची मागणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली होती. नवेगावमध्ये दोन वनमजूर उपलब्ध असताना नागझिरामध्ये एकच वनमजूर का, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. वनकर्मचारी सुरक्षित नसतील तर वनालगतच्या नागरिकांची सुरक्षितताही धोक्यात येईल. शासनाने तातडीने मनुष्यबळ आणि आधुनिक सुरक्षा साधने उपलब्ध करावीत.”
■ संघटनेच्या ठळक मागण्या
✔️ शासन निर्णयानुसार ₹२५ लाख नुकसानभरपाई, अनुकंपा नियुक्ती व सर्व आर्थिक लाभ तातडीने मंजूर करावेत.
✔️ स्व. श्यामू शरणागत यांना ‘शहीद’ घोषित करावे.
✔️ गस्तीसाठी किमान तीन सदस्यांचे पथक अनिवार्य करावे.
✔️ वनरक्षकांना हेल्मेट, संरक्षक जॅकेट, वायरलेस, जीपीएस, सायरन, उच्च क्षमतेचे टॉर्च व इतर आधुनिक सुरक्षा साहित्य उपलब्ध करावे.
✔️ संवेदनशील वनक्षेत्रात नियमित प्रशिक्षण, मॉक ड्रिल व आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा कार्यान्वित करावी.
जखमी वनमजूरास तातडीने आर्थिक मदत व उपचार द्यावेत.
■ दैनिक भंडारा पत्रिका विशेष
“सीमेवर देशाचे रक्षण करणारा जवान… जंगलात वनसंपदेचे रक्षण करताना हुतात्मा झाला. ही केवळ एका वनरक्षकाच्या मृत्यूची घटना नाही, तर वनकर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या व्यवस्थेचा गांभीर्याने पुनर्विचार करण्याची वेळ आल्याचा इशारा आहे.”