भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदूर : ‘आरक्षण भिक नाही, आमचा अधिकार आहे’, अशा घोषणा देत आरक्षणाच्या घटनात्मक संरक्षणाची मागणी करण्यात आली. आरक्षण बचाव संघर्ष समिती लाखांदूरच्या वतीने सोमवार, १८ आॅगस्ट रोजी छत्रपती शिवाजी चौकात एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. विविध न्याय मागण्यांचे निवेदन राष्ट्रपतींकडे सादर करण्यासाठी समितीच्या शिष्टमंडळाने पुढाकार घेतला. यावेळी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना कार्यक्रमाचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते रोशन फुले म्हणाले की, भारतीय संविधान हा प्रत्येक नागरिकाचा आत्मा आहे. संविधानाने दिलेले अधिकार अबाधित ठेवणे गरजेचे असून, आरक्षणाच्या माध्यमातून सामाजिक विषमता दूर करून समान संधी व प्रतिनिधित्व सुनिश्चित करण्यात आले आहे.
सध्याच्या काळात आरक्षणाविरोधात सुरू असलेला प्रचार आणि उपवर्गीकरणाच्या नावाखाली समाजाला विभागण्याचे प्रयत्न चिंतेची बाब असल्याचे फुले यांनी सांगितले. आरक्षण व्यवस्था कोणत्याही प्रकारे कमकुवत झाल्यास त्याचा सामाजिक न्यायाच्या व्यवस्थेवर व्यापक परिणाम होऊ शकतो, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. या आंदोलनाला विशेष अतिथी म्हणून शालिकराम हत्तीमारे, भंडारा जिल्हा काँग्रेस महासचिव उत्तम भागडकर, डी. जी. रंगारी, निरु मेश्राम, स्वप्निल बनसोड, युवराज सुखदेवे, प्रभाकर मेश्राम, हरिदास खोब्रागडे, बंडू फुलझेले, खुशाल बोरकर, जांभुळकर, ज्ञानेश्वर राऊत, सरपंच नानाजी अडकिने यांच्यासह समितीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन शंकर हुमणे यांनी केले. प्रास्ताविक रहीम मेश्राम यांनी केले, तर आभार चंद्रहंस चव्हाण यांनी मानले.