
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यात शिक्षक होण्याचं स्वप्न पाहणाºया हजारो तरुणांसाठी महत्त्वाची असलेली महाटीईटी (महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा) २८ जून रोजी आयोजित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी २३ जून रोजी जिल्हा परिषद सभागृहात जिल्हा समन्वय समितीची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत परीक्षेचं नियोजन सुरळीत पार पाडण्यासाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी निर्मला माने यांनी केंद्रनिहाय आढावा घेतला. तसेच शिक्षणाधिकारी (योजना) रविंद्र सोनटक्के यांनी परीक्षा शांततेत व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी आवश्यक सूचना दिल्या. बैठकीस माध्यमिक शिक्षणाधिकारी मनिषा गजभिये, उपशिक्षणाधिकारी रमाकांत झाल्टे, मोहन उशीरे, मंगला गोताराने, शिक्षण विस्तार अधिकारी लता धकाते,
झोनल अधिकारी, सहाय्यक परिरक्षक, केंद्रसंचालक तसेच राखीव कर्मचारी उपस्थित होते. प्राथमिक उपशिक्षणाधिकारी राहुल बावा यांनी आभार मानले. जिल्ह्यात एकूण ३४ परीक्षा केंद्रांवर ८७८० परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत. त्यापैकी पेपर-एकसाठी १४ केंद्रांवर ३८४४ परीक्षार्थी बसणार असून त्यासाठी २८२ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तर पेपर-दोनसाठी २० केंद्रांवर ४९३६ परीक्षार्थींसाठी ३७० कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. कोणतीही अडचण उद्भवल्यास तत्काळ मदत मिळावी यासाठी राखीव कर्मचाºयांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. महाटीईटी ही इयत्ता १ ते ८ पर्यंत अध्यापन करण्यासाठी आवश्यक असलेली पात्रता परीक्षा आहे. यंदा भंडारा जिल्ह्यातून मोठ्या संख्येने तरुण-तरुणी शिक्षक होण्याच्या उद्देशाने परीक्षेला बसत आहेत. परीक्षा सुरळीत आणि गैरप्रकारमुक्त पार पडावी यासाठी सर्व परीक्षा केंद्रांवर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून, गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.