भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्यसभेचे खासदार राजेंद्र जैन यांनी नवनिर्वाचित सदस्य म्हणून शपथ घेतल्यानंतर प्रथमच राज्यसभेत भाषण करताना गोंदियाभंडारा परिसरातील भात (राईस) उद्योगाच्या गंभीर समस्यांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधले. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विकास (दुरुस्ती) विधेयकाला पाठिंबा दर्शवितानाच त्यांनी या भागातील भात उद्योगाला वीजदरात सवलत, अनुदानात वाढ आणि उत्पादन खरेदीत प्राधान्य देण्याची जोरदार मागणी केली. राज्यसभेतील चर्चेदरम्यान खासदार जैन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना सक्षम करण्यासाठी सरकारने आणलेल्या दुरुस्ती विधेयकाचे स्वागत केले. या विधेयकामुळे उद्योजकांना सुलभ नोंदणी, वेळेत देयके, जलद वाद निवारण आणि विश्वासाधारित अनुपालनाची सुविधा उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी त्यांनी गोंदिया-भंडा- रा, तसेच मध्य प्रदेश व छत्तीसगड सीमेलगतच्या भागात भात उद्योग हा रोजगाराचा प्रमुख आधार असल्याचे अधोरेखित केले. मात्र, गेल्या काही वर्षांत वाढते उत्पादन खर्च, वीजदर आणि आर्थिक अडचणींमुळे हा उद्योग संकटात सापडल्याचे त्यांनी नमूद केले. भात उद्योगालाही सूक्ष्म व लघुउद्योगांच्या सर्व योजनांचा प्रभावी लाभ मिळावा, वीज बिलात विशेष सवलत द्यावी, अनुदान वाढवावे आणि एमएसएमई अंतर्गत तयार होणाºया उत्पादनांच्या शासकीय खरेदीत या उद्योगाला प्राधान्य द्यावे, अशी मागणी त्यांनी सभागृहात केली. हे विधेयक केवळ कायद्यातील दुरुस्ती नसून ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘विकसित भारत २०४७’च्या संकल्पनेला बळ देणारे महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे सांगत, सरकारने भात उद्योगालाही आवश्यक आधार दिल्यास विदर्भातील हजारो कामगारांना रोजगाराची नवी संधी उपलब्ध होईल आणि गोंदियाभंडारा परिसराच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल, असा विश्वास खासदार जैन यांनी व्यक्त केला.