
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी मोहाडी : तालुक्यातील बेटाळा येथे सोमवारी (दि. २९ जून) दुपारी विज कोसळून एका शेतकºयाचा दुदैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. खरीप हंगामातील पेरणीचे काम सुरू असतानाच निसर्गाच्या या अचानक आलेल्या संकटाने शेतकरी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून गावात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बेटाळा येथील रहिवासी रामकृष्ण तुकडोजी देशमुख (वय ५६) हे सोमवारी दुपारी सुमारे ३.३० वाजताच्या सुमारास आपल्या शेतात खरीप हंगामाची पेरणी करीत होते. यावेळी अचानक पावसाला सुरुवात झाली आणि विजांचा कडकडाट सुरू झाला. त्याचदरम्यान त्यांच्या अंगावर वीज कोसळल्याने ते गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेतली; मात्र त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. घटनेची माहिती मिळताच मोहाडी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी मोहाडी येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. या घटनेमुळे बेटाळा गावासह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून शेतकºयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.