भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन शनिवार, १५ आॅगस्ट २०२६ रोजी जिल्ह्यात अत्यंत उत्साहात आणि दिमाखात साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा व विविध उपक्रमांच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात विविध विभागांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस अपर जिल्हाधिकारी राजेंद्रकुमार जाधव, उपजिल्हाधिकारी लीना फलके, अधीक्षक रोहिणी पाठराबे यांच्यासह विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
यावेळी बोलताना निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर चव्हाण म्हणाले, “स्वातंत्र्य दिनाचा मुख्य शासकीय समारंभ यंदा जिल्हाधिकारी कार्यालयातील परिसरात आयोजित करण्यात येणार आहे. सर्व विभागांनी परस्परांशी उत्तम समन्वय राखून आपल्याला सोपवलेल्या जबाबदाºया वेळेत व काटेकोरपणे पार पाडाव्यात. कार्यक्रमात कुठलीही त्रुटी राहणार नाही याची दक्षता सर्व यंत्रणांनी घ्यावी.” बैठकीत मुख्य ध्वजारोहण सोहळा, पोलीस व गृहरक्षक दलाचे संचलन,सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियंत्रण, पिण्याच्या पाण्याची सोय, आरोग्य पथकाची नियुक्ती, स्वच्छता आणि विद्युत व्यवस्था यांसारख्या आवश्यक बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला.