भंडारा पत्रिका/ तालुका प्रतिनिधी मोहाडी : तालुक्यातील रोहणा ते इंदूरखा रस्त्याच्या मधोमध असलेल्या नाल्यावर पुलाचे बांधकाम सुरू असल्याने सदर ठेकेदाराने नागरिकांना जाण्यायेण्या साठी दुसरा कच्चा पुल तयार करून दिला होता. तो पुल पहिल्याच पावसात वाहून गेला. पुल वाहून गेल्याने रोहणा ते इंदूरखा हा मार्ग १५ दिवसापासून पूर्णत: बंद झाला आहे. यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तातडीने दुसरा पूल तयार करून, कन्स्ट्रक्सन कंपनीला काळया यादीत टाकावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुनिल मेश्राम यांनी मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी भंडारा, अधीक्षक अभियंता यांच्याकडे एका तक्रारीद्वारे केली आहे. ठेकेदाराने सदर पुलाचे काम थातूरमातुर केल्याने हा पूल वाहून गेला आहे.
मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा – २ आशियाई विकास बँक (एडीबी) टप्पा – २ अर्थसहाय्य अंतर्गत राज्य मार्ग ३५५ दहेगाव ते रोहणा तालुका सीमा रस्त्यावर सा. क्र. ३/६०० मध्ये रोहणा ते इंदूरखा रस्त्याच्या मधोमध नाल्यावर पुलाचे बांधकाम मंजूर झाले असून प्रशासकीय मान्यता ५ कोटी ९६ लक्ष ७२ हजार रुपयाची आहे. तर निविदा रक्कम ३ कोटी १६ लक्ष ७२ हजार रुपये आहे. निविदेमध्ये हे काम वेदांत कन्स्ट्रक्सन भंडारा यांना मिळाले आहे. यापूर्वी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने चार वेळा या पुलाची दुरुस्ती केली. त्यावर करोडो रुपये खर्च केले. मात्र प्रत्येक वर्षी पावसाळ्यात हा पूल वाहून जायचा. आता या पुलाचे नव्याने बांधकाम सुरू आहे. नवीन पुलाचे बांधकाम सुरू करण्यापूर्वी ठेकेदाराने नवीन पुलाच्या कामाच्या बाजूने लोकांना जाण्यायेण्यासाठी जुन्या तुटल्या फुटल्या पायल्या घालून त्यावर माती घातली आणि निकृष्ठ पूल तयार केले. हे पुल पूर्णत: वाहून गेले. इंदूरखा ते रोहणा हा मार्ग पूर्णता बंद झाल्याने शेतकरी, विद्यार्थी, कर्मचारी, कामगार यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
भंडारा येथे जाण्या साठी हा मार्ग जवळचा असल्याने ह्या रस्त्याने मोठी वर्दळ राहायची. आता लोकांना फेºयाच्या रस्त्याने जाणे येणे करावे लागत आहे. रोहणा गावाकडून भंडाराकडे रोज जाणारे मजूर, शेतकरी, विद्यार्थी, कर्मचारी आणि ईतर नागरिक हे पुलाच्या त्या बाजूला आपल्या दुचाकी ठेवतात आणि तुटलेल्या पुलाच्या बाजूने पाण्यातून प्रवास करून त्या बाजूला जातात. तसेच भंडारा, इंदूरखा कडून रोज येणारे नागरिक हे रोहणा गावाकडील बाजूस आपल्या दुचाकी ठेवतात आणि पाण्यातून प्रवास करून आपली दिनचर्या चालवतात. यावेळी नागरिकांना मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. नवीन पुलाचे काम “बिलो” मध्ये असल्याने ठेकेदार या पुलाचे काम निकृष्ठ दर्जाचे व संथगतीने करीत आहे. त्यामुळे नवीन पुलाचे काम अपूर्ण आहे. नवीन पुलाचे काम पूर्ण होण्यासाठी १ वर्ष लागणार असल्याने हा मार्ग कुठ पर्यंत बंद राहील असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
शासन नागरिकांना जाण्यायेण्याची सोय व्हावी म्हणून दरवर्षी पूल बांधण्यासाठी आणि दुरुस्तीसाठी करोडो रुपये खर्च करते, मात्र ज्यांच्याकडे हा पैसा खर्च करण्यासाठी येते तेच अधिकारी ठेकेदारांना हाताशी धरून बोगस कामे करून अर्धाअधिक पैसा आपल्या घशात घालतात. त्यामुळे जिकडे-तिकडे बोगस कामे होत आहेत. असाच प्रकार रोहणा ते इंदूरखा रस्त्याच्या मधोमध सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामात सुरू आहे. त्यामुळे संथगतीने व बोगस पुलाचे बांधकाम करणाºया ठेकेदाराचा परवाना रद्द करून सदर कामाचे देयके थांबविण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुनिल मेश्राम यांनी केली आहे.