गोवर्धन निनावे/भंडारा पत्रिका भंडारा : मागील काही वर्षांपासून भंडारा शहरातील मुख्य रस्ते तसेच गल्लोगल्ली असलेल्या अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. पावसाळ्यात या खड्डयांमध्ये पाणी साचत असल्याने वाहनचालक, दुचाकीस्वार, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. शहरातील खराब रस्त्यांमुळे अपघातांची शक्यता वाढली होती. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी भंडारा शहरातील विविध युवक संघटना, सामाजिक कार्यकर्ते, सर्वपक्षीय पदाधिकारी, नागरिक आणि विविध संस्थांनी एकत्र येत नगरपरिषद तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वेळोवेळी निवेदने सादर केली. काही ठिकाणी नागरिकांनी अनोख्या पद्धतीने खड्डयांचे प्रदर्शन करून प्रशासनाचे लक्ष वेधले. या जनआंदोलनामुळे शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीचा प्रश्न अधिक प्रभावीपणे पुढे आला.
नागरिकांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची दखल घेत भंडारा नगरपरिषदेने शहरातील खड्डे बुजविण्याचे तसेच खराब झालेल्या रस्त्यांचे नूतनीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे. अनेक ठिकाणी काँक्रीट रस्त्यांचे काम सुरू असून शहरातील प्रमुख मार्गांसह विविध भागांमध्ये युद्धपातळीवर काम सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सध्या सुरू असलेल्या कामामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर वाहतूक अधिक सुरक्षित होणार असून, अपघातांचा धोका कमी होईल तसेच दैनंदिन प्रवास अधिक सुलभ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. भंडारा शहरातील युवक संघटना, सामाजिक संस्था, सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि जागरूक नागरिकांनी एकजुटीने केलेल्या पाठपुराव्यामुळे हा प्रश्न मार्गी लागल्याची भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केली. प्रशासनानेही नागरिकांच्या मागण्यांची दखल घेत आवश्यक उपाययोजना सुरू केल्याने शहराच्या विकासाच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. नागरिकांनी सुरू असलेली कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याची मागणी केली असून, उर्वरित खराब रस्त्यांचेही लवकरात लवकर नूतनीकरण करण्यात यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.