भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : गावाच्या विकासात आपलाही सहभाग असावा, या सामाजिक भावनेतून ‘आठवड्यातील एक तास गावासाठी’ या उपक्रमांतर्गत पांढराबोडी येथील युवकांनी आज रविवारी सकाळी ८ ते ९ वाजेपर्यंत स्मशानभूमी परिसरात श्रमदान व स्वच्छता अभियान राबविले. या अभियानादरम्यान युवकांनी स्मशानभूमी परिसरातील कचरा, झाडाझुडपे व अस्वच्छता दूर करून परिसर स्वच्छ केला. तसेच वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. गाव स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक ठेवण्यासाठी नागरिकांनीही पुढाकार घेत नियमितपणे अशा सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. विशेष म्हणजे, या उपक्रमात गावातील युवकांसोबत ज्येष्ठ नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. गावाच्या विकासासाठी युवकांनी घेतलेल्या पुढाकाराचे उपस्थित नागरिकांनी कौतुक करून समाधान व्यक्त केले.
या श्रमदान अभियानात सरपंच जगन्नाथ वाघमारे, सदस्य चंद्रशेखर वाघमारे तसेच सामाजिक कार्यकर्ते व युवा सहभागी झाले. यामध्ये अमित वाघमारे, चेतन भुरे, बादल वाघमारे, बालू वाघमारे, जितेंद्र साठवणे, दादू भुरे, निखिल भुरे, पिंटू भुरे, रविंद्र गाढवे, अण्णा भुरे, रोहित वाघमारे, शुभम चकोले, रमन भुरे यांच्यासह गावातील नागरिकांची उपस्थिती होती. ‘दर रविवारी एक तास गावासाठी’ हा उपक्रम यापुढेही नियमितपणे राबविण्याचा संकल्प पांढराबोडीतील युवकांनी केला असून, गावाच्या विकासासाठी सामूहिक सहभागाची ही चळवळ अधिक व्यापक करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.