भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यातील सर्व ईपीक पाहणी सहाय्यकांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, भंडारा येथे जिल्हाधिकाºयांना निवेदन सादर केले. या निवेदनाची दखल घेत माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेऊन योग्य स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. निवेदनात म्हटले आहे की, ई-पीक पाहणीचे शंभर टक्के काम सहाय्यकांमार्फत करून घेतले जात असून, त्यांना कोणतेही अधिकृत नियुक्तीपत्र देण्यात आलेले नाही. पावसाळ्याच्या काळात शेतात काम करताना साप, विंचू तसेच इतर वन्यप्राण्यांचा धोका पत्करून काम करावे लागत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
ई-पीक पाहणीदरम्यान वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात किंवा अपघातात सहाय्यकाचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाला ५० लाख रुपयांचा सुरक्षा विमा देण्यात यावा, तसेच अपघातात जखमी झाल्यास आर्थिक मदत मिळावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. याशिवाय प्रति पीक योग्य मानधन, अधिकृत नियुक्तीपत्र, जीपीएस लोकेशनची मर्यादा वाढविणे, मोबाईल अॅपमधील फेस आयडी, ओटीपी व इंटरनेटसंबंधी तांत्रिक अडचणींसाठी सहाय्यकांना जबाबदार धरू नये, सर्व सहाय्यकांना सेफ्टी शूज उपलब्ध करून द्यावेत आणि प्रलंबित मानधन तातडीने अदा करावे, अशा विविध मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या. जिल्हाधिकाºयांनी निवेदनाची गंभीर दखल घेत सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासन दिल्याने ई-पीक पाहणी सहाय्यकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले. तसेच प्रशासनाने लवकरात लवकर मागण्यांवर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही सहाय्यकांनी व्यक्त केली. निवेदन देण्याकरिता आकाश रामटेके टेकेपार डोड, राहुल राऊत, पंकेश काळे, अमन गोंडाणे, दिनेश भुते, छगन चोपकर, निलेश कोटांगले, जितेंद्र बुराडे, आकाश केवट, आकाश ईश्वरकर इत्यादी विविध गावातील ई पिक साहाय्यक उपस्थित होते.