तुमसरमध्ये उड्डाणपुलाच्या कामामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : येथील रेल्वे विभागाकडून सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामामुळे शहरात धुळीचे प्रचंड साम्राज्य निर्माण झाले आहे. मातीचे खोदकाम आणि अवजड वाहनांची सततची वर्दळ यामुळे हवेत मोठ्या प्रमाणात धूळ उडत असून, स्थानिक नागरिक, पादचारी आणि व्यापारी कमालीचे त्रस्त झाले आहेत. या वाढत्या प्रदूषणामुळे शहराचे दैनंदिन जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.

आरोग्याची मोठी चिंता: श्वसनाचे आजार बळावले…

हवेतील धुळीच्या घातक कणांमुळे लहान मुले आणि वृद्धांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. विशेषत: दमा (अस्थमा), खोकला आणि अ‍ॅलर्जी असणाºया नागरिकांना श्वास घेण्यास प्रचंड त्रास होत आहे. नागरिकांमध्ये डोळे जळजळणे, घशात खवखव होणे अशा तक्रारी मोठ्या प्रमाणावर वाढल्या असून स्थानिक रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे.

व्यापाºयांचे कंबरडे मोडले; ग्राहकांनी फिरवली पाठ…

रस्त्यालगत असलेल्या दुकानांमध्ये दिवसभर धूळ साचत असल्याने व्यापारी हवालदिल झाले आहेत. दुकानातील साहित्याचे नुकसान होत असून, धुळीच्या भीतीपोटी ग्राहकांनी या भागातील बाजारात येणे टाळले आहे. परिणामी, स्थानिक व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून त्यांची ग्राहकसंख्या कमालीची रोडावली आहे.

कमी दृश्यमानतेमुळे अपघातांचा धोका…

अवजड वाहने गेल्यानंतर संपूर्ण परिसरात धुळीचे लोट निर्माण होतात. यामुळे रस्त्यावरील दृश्यमानता अत्यंत कमी होते. समोरून येणारे वाहन न दिसल्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत असून, या भागात गंभीर अपघातांची शक्यता निर्माण झाली आहे.

प्रशासनाकडून तातडीच्या उपाययोजनांची मागणी

संतापलेल्या स्थानिक नागरिकांनी आणि व्यापाºयांनी रेल्वे प्रशासन व कंत्राटदाराकडे तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे. नियमित पाण्याचा फवारा: रस्ता उखडलेल्या भागात आणि मातीच्या कच्च्या रस्त्यावर टँकरद्वारे दिवसातून किमान ३ ते ४ वेळा नियमितपणे पाण्याचा फवारा मारण्यात यावा.

हिरव्या जाळ्यांचे कवच:

बांधकाम आणि खोदकाम सुरू असलेल्या ठिकाणी धुळीला प्रतिबंध करण्यासाठी चारही बाजूंनी हिरव्या जाळ्या किंवा पत्रे लावून परिसर सुरक्षित करावा.

मनुष्यबळात वाढ व गतिमर्यादा:

बांधकाम परिसरात वाहनांच्या गतीवर मर्यादा आणण्यासाठी तात्पुरते गतिरोधक तयार करावेत. तसेच, हे काम वेळेत पूर्ण करून धुळीचा त्रास संपवण्यासाठी आवश्यक मनुष्यबळात वाढ करण्यात यावी. प्रशासनाने या समस्येकडे त्वरित लक्ष न दिल्यास येत्या काळात नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक रहिवाशांनी दिला आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *