भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गडचिरोली : बुधवारी मध्यरात्री पासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून भामरागड तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील अनेक नद्या-नाले दुथडी भरून वाहत असल्याने २४ प्रमुख मार्गांवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. भामरागडमध्ये पूरग्रस्त भागातील ७०० नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असून, त्यांची आश्रमशाळा व इतर सुरक्षित ठिकाणी निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. आरमोरी तालुक्यात निसर्गाचे रौद्ररूप पाहायला मिळत आहे. सती नदीला पूर आल्यामुळे कढोलीवैरागड मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. कठाणी नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने पुराचे पाणी थेट राजोली गावात शिरले आहे. अनेकांच्या घरात पाणी साचल्यामुळे संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले असून नागरिकांचे हाल होत आहेत.