भंडारा पत्रिका / प्रतिनिधी चंद्रपूर : घरची जनावरे चारण्याकरिता जंगलात गेलेल्या एका ६८ वर्षीय शेतकºयावर पट्टेदार वाघाने हल्ला केला. परंतु, जवळच असलेल्या मुलाने वाघाशी झुंज देऊन काठी हाणल्याने वाघाने जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. वाघाच्या हल्ल्यातून वडिलाची सुखरूप सुटका केल्याने मुलाचे सर्वत्र कौतुक होत आहे. गोविंदा वारलू चौखे असे वडिलाचे, तर श्रीकृष्ण गोविंदा चौखे असे मुलाचे नाव आहे. जखमीला चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चिमूर तालुक्याच्या ठिकाणापासून १० किलोमीटर अंतरावर ताडोबा अभयारण्याच्या बफरझोन लगत छोटेसे सातरा नावाचे गाव आहे. गोविंदा वारलू चौखे हे सातारा येथील रहिवासी आहे. सातारा गावापासून अर्धा किलोमीटर अंतरावर बफरझोन लगत त्यांचे शेत आहे. ते स्वत:च्या मालकीच्या जनावरांना शेतशिवाराकडे नेहमीच चराईसाठी घेऊन जातात. मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास गोविंदा चौखे हे मुलगा श्रीकृष्ण सोबत ५ ते ६ जनावरे चराईसाठी घेऊन गेले होते. त्यांच्या शेताला लागून वामन ढोणे यांचे शेत आहे. या शेतात दुपारी २ वाजताच्या सुमारास पट्टेदार वाघाने थेट गोंविदा यांच्यावर हल्ला चढविला. हल्ला होताच त्यांनी प्रचंड आरडाओरड सुरू केली. वडिलांपासून काही अंतरावर मुलगा श्रीकृष्ण हातात काठी घेऊन जनावरांची राखण करीत होता. आरड- ाओरड ऐकून तो वडिलांना वाचविण्याकरिता हातात काठी घेऊन धावून आला. त्याने हातातील काठीने वाघावर प्रहार केला. त्यामुळे वाघाने पकड सैल करीत वडिलांना सोडून जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. वाघाने मान व पाठीवर हल्ला केल्याने वडील जखमी झाले. घटनेची माहिती लगेच वनविभागाला देण्यात आली. वनविभागाची चमू काही वेळातच घटनास्थळी दाखल झाली. वनविभागाच्या वाहनाने जखमी गोविंदा यांना चिमूर उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले.