भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : विधिमंडळाच्या गेटवर एका महिलेने स्वत:च्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरक्षारक्षकांना वेळीच हा प्रकार लक्षात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. संतांचा वारंवार अपमान केला जात असून यावर सरकार काही कारवाई करत नाही. यामुळे महिलेने आत्मदहनाचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले जात आहे. कुणीही संतांचा अपमान करत सुटले आहे, यावर सरकार काहीही करत नाही याचा राग व्यक्त करण्यासाठी महिलेने स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतले. कविता चव्हाण असे या महिलेचे नाव असून त्या सोलापूर येथील रहिवासी आहेत. दरम्यान, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे एका वक्तव्यामुळे अडचणीत आल्या आहेत. संतांनी रेड्याला शिकवले. पण माणसांना कुठं शिकवलं?, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले असल्याचा एक व्हिडिओ चर्चेत आला आहे. संत ज्ञानोबा माऊलींनी रेड्याकडून वेद वदवून घेतले होते. तोच दाखला देत अंधारेंनी हे वक्तव्य केले. पण त्यावरुन वारकरी संप्रदाय आक्रमक झाला आहे.