भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यातील भटक्या/ विमुक्त जाती/ जमातीसाठी यशवंतराव चव्हाण सामुहिक व वैयक्तिक घरकुल योजनेचे २०२१ ते २०२३ या दोन वर्षाचे तीन हजार पन्नास घरकुलांचे पात्र लाभार्थी असून शासनाने एकही निधी उपलब्ध करून दिला नसल्याबाबत व आॅगस्ट महिन्यात १३/१४ तारखेला भंडारा जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यामुळे आलेल्या पुरामुळे मासेमारांचे खूप नुकसान झाले. प्रशासनामार्फत पंचनामे करून सुद्धा आतापर्यंत नुकसान भरपाई मिळाली नाही या कारणामुळे सर्व ढीवर समाज संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवार दि. १३ फेब्रुवारी २०२३ ला धडक मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे प्रमुख नेतृत्व जि.प.सदस्या अनिता भुरे, सुनिता मोहनकर, राजकुमार मोहनकर, अनिल मांढरे निषाद पार्टी विदर्भ प्रभारी, सुरेश खंगार, मोहन खेडकर निषाद पार्टी जिल्हा संघटक, प्रकाश पचारे, कारु नान्हे, दीनानाथ वाघमारे, संजय भुरे, सखाराम मारबते, रमेश मांढरे, रणजीत चाचीरे, सुरेश मांढरे,हरिश्चंद्र बर्वे यांनी केले. सदर धडक मोचाद्वारे विविध प्रकारच्या मागण्या मागण्यात आल्या. त्यांपैकी यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेचे पात्र लाभार्थ्यांना घरे बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा, मासेमारी संस्थांना अतिवृष्टी व पूरग्रस्त मासेमारांना नुकसान भरपाई देण्यात यावे, पुरात पडलेल्या घरांना यशवंतराव चव्हाण घरकुल देण्यात यावे, गावातील अतिक्रमण असलेले घरांना पट्टे मासेमारी समाजांना देण्यात यावे, अशा प्रकारच्या विविध मागण्या जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे पाठविण्यात आले. निषाद पार्टी विदर्भ प्रभारी अनिल मांढरे यांनी सदर मोर्चात प्रशासनाला चेतावणी दिली आहे की, जर तीस दिवसात सर्व मागण्या पूर्ण न झाल्यास भंडारा जिल्ह्यातील सर्व मोबाईल टॉवर हायजॅक करून त्या टॉवरवर चढून आंदोलन करण्यात येईल.