भंडारा पत्रिका / प्रतिनिधी आमगाव : राज्य सरकारने आमगाव नगर परिषदचा न्यायालयीन प्रकरण निकाली काढण्यासाठी संघर्ष समितीने साखळी उपोषण सुरू केले आहे. मात्र शासन व प्रशासनाने अद्याप दखल घेतली नाही. त्यामुळे आपल्या मागणीकडे लक्ष वेधण्याकरिता नागरिकांनी २५ मार्च रोजी संतप्त होऊन रस्त्यांवर टायर जाळून रस्ता रोखून आंदोलन केले.
आमगाव नगर परिषदेचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेले प्रकरण राज्य सरकारने निकाली काढावे या मागणीला घेऊन सलग आठ वर्षांपासून संघर्ष समितीने राज्य सरकारला अनेक निवेदने दिले. आंदोलन केले. परंतु राज्य सरकार न्याय देत नसल्याने अखेर संघर्ष समितीने २१ मार्चपासून अनिश्चितकालीन साखळी उपोषण तहसील कार्यालय समोर सुरू केले आहे. त्याला पाच दिवसाचा कालावधी लोटूनही शासन, प्रशासनातर्फे दखल घेतली गेली नाही. त्यामुळे २५ मार्च रोजी क्षेत्रातील माल्ही येथे सभेचे आयोजन करुन आंदोलनावर चर्चा करण्यात आली. यावेळी रवी क्षीरसागर, यशवंत मानकर, संजय बाहेकर, उत्तम नंदेश्वर, मुन्ना गवली, रामेश्वर श्यामकुवर यांनी नागरिकांना मार्गदर्शन केले. यावेळी नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या व माल्ही-शंभूटोला मार्गावर टायर जाळून रस्ता रोखून धरला व शासनाचे आपल्या मागणीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.