भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : पोलीस पाटील पदांची भरती घेत असताना लेखी परीक्षेचे गुण कोणत्याही उमेदवाराला न कळवता सरळ मुलाखतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांची यादी लावण्यात आली आहे. पोलीस पाटील भरती पारदर्शक पद्धतीने घेण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार विरोधी सामाजिक न्यायमंचच्या वतीने मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. भंडारा तालुक्यातील पोलीस पाटील पदाच्या भरतीसाठी दिनांक ८ एप्रिलला लेखी परीक्षा घेण्यात आली.मात्र कोणत्याउमेदवाराला किती गुण मिळाले त्याची यादी प्रकाशित न करता सरळ मुलाखतीसाठी बोलविण्यात आलेल्या उमेदवारांची यादी लावण्यात आली आहे. त्यामुळे उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला.पोलीस पाटलाच्या पदाकरिता घेण्यात आलेल्या परीक्षेचे गुण जाहीर करावे. पारदर्शकपणे भरती करण्यात यावी.
कोणत्याही उमेदवारांवर अन्याय होऊ नये. भ्रष्टाचार न होता भरती प्रक्रिया व्हावी अशा मागणीचे निवेदन अखिल भारतीय भ्रष्टाचार विरोधी सामाजिक न्याय मंचचे विदर्भ अध्यक्ष सुरज परदेशी, विदर्भ कार्याध्यक्ष विष्णुदास लोणारे, नितेश बोरकर, राज शेख, बबन बुध्दे, हरीश पंचबुदे, ओमदेव बोरकर तसेच अनेक कार्यकर्ते यांनी निवासी जिल्हाधिकारी महेश पाटिल, उपविभागीय अधिकारी कार्यालय भंडारा व मुख्यमंत्री यांना पाठविले आहे.