भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी परमबीरसिंह यांच्याविरोधातील सर्व आरोप मागे घेतल्याबद्दल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारवर टीका केली. महाविकास आघाडीची बदनामी केल्याचे बक्षीस परमबीरसिंह यांना देण्यात आल्याचे पटोले म्हणाले. केंद्रीय प्रशासकीय लवादाच्या निर्णयानंतर राज्य सरकारने मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंह यांच्या विरोधातील आरोप राज्य सरकारने मागे घेतले आहेत.
मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे जाणीवपूर्वक हे प्रकरण कमकुवत केले आणि तांत्रिक कारणाच्या आधारे परमबीरसिंह यांची सुटका होईल, हे सुनिश्चित केले, असा आरोप पटोले यांनी पत्रकारांसोबत चर्चा करताना केला. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करीत सिंह यांनी शिवसेना-राकाँकाँग्रेसच्या महाविकास आघाडीची बदनामी केली, असे पटोले यांनी म्हटले. चौकशीनंतर सिंह यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याचा स्पष्ट निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला दिला होता तसेच त्यांची विभागीय चौकशीही अपेक्षित होती, असे पटोले यांनी सांगितले.