भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : साकोली येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत सन २०२२-२३ मध्ये शालांत परीक्षा व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी नानाभाऊ पटोले यांनी उपस्थित विद्यार्थी आणि पालकांना संबोधित केले. शालेय शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचे असते कुठल्याही व्यवसायाचा किंवा उच्च शिक्षणाचा पाया हा शालेय शिक्षणात असतो. त्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रात करिअरचा मार्ग निवडा मात्र शालेय परीक्षेला देखील तेवढ्याच जिद्दीने सामोरे जा! यूपीएससी- एमपीएससी यांसारख्या स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून चांगले अधिकारी बना, चांगले नागरिक बना आणि भविष्यात कधीही कुठलीही मदत लागली तर मला हाक द्या, असे प्रेरणादायी प्रतिपादन नानाभाऊ पटोले यांनी यावेळी बोलताना केले.
याप्रसंगी भंडारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मोहन पंचभाई, पोलीस अधीक्षक लोहित मतानी ,डॉ.संदीप गजभिये, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशांत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ.अशोक कापगते,साकोली शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दिलीप मासुरकर,महिला शहर काँग्रेसच्या अध्यक्षा सौ. पुष्पा कापगते तसेच शिक्षणाधिकारी व अन्य अधिकारी उपस्थित होते.