भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना टप्पा-२ (मिशन-२०२५) अंतर्गत शेतकºयांना दिवसा शाश्वत वीज पुरवठा करण्यासाठी शासनाने या महत्वाकांक्षी योजनेचा शासन निर्णय ८ मे २०२३ रोजी निर्गमित केला. ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत ७००० मेगावाट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी “एम.एस. ई.बी. सोलर अॅग्रो पॉवर मर्यादित” ही विशेष हेतू कंपनी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सुत्रधारी कंपनी मर्यादितची उपकंपनी म्हणून काम करणार आहे. या कंपनीची स्थापना ३१ मे २०२३ रोजी झाली असून ७ जून रोजी एच.एस.बी.सी.बँक बिल्डिंग तिसरा माळा, फोर्ट, मुंबई येथे या कंपनीच्या संचालक मंडळाची पहिली बैठक संपन्न झाली. संचालक मंडळामध्ये प्रामुख्याने आभा शुक्ला (प्रधान सचिव ऊर्जा) बाळासाहेब थिटे, (संचालक वित्त, मराविमं सुत्रधारी कंपनी) आणि चंद्रशेखर गद्रे (मुख्य महाव्यवस्थापक वित्त महावितरण) यांचा समावेश आहे.