प्रतिनिधी नागपूर : नाग नदीला आलेल्या पुरामुळे सुमारे दहा हजार घरांचे नुकसान झाले आहे. घरात पाणी शिरल्यामुळे घरगुती साहित्य तसेच अन्नधान्य भिजले असून घरातील चिखल काढण्यासाठी नागरिकांना मदत करण्यात येईल. तसेच नुकसानीसंदर्भात तात्काळ पूर्ण करून मदत देण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी रविवारी नुकसानीची प्रत्यक्ष पहाणी केली. पुराची तसेच नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याच्या घटनांची संपूर्ण माहिती यावेळी त्यांनी घेतली. तासात १०९ मिलिमीटर पाऊस झाला असून पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी नदीचे पात्र कमी पडल्यामुळे इतर वस्त्यांमध्ये पाणी शिरले. यापुढे अशी घटना घडणार नाही, याची दखल घेण्यात आली असून पाण्याचा प्रवाह कुठेही थांबणार नाही, या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात येईल. भविष्यात अशा घटना टाळण्यास येतील असेही नागरिकांना त्यांनी सांगितले. पुराचे पाणी घरात शिरल्यामुळे सर्वत्र चिखल साचला आहे. तसेच घरातील चिखल काढण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. आरोग्याच्या दृष्टीने खबरदारीच्या उपाययोजना म्हणून सर्वांना क्लोरीनच्या गोळ्या देण्यात येत आहेत. जिल्हा प्रशासन व महानगरपालिकेने तातडीने उपाययोजनाकराव्यात असे निर्देश फडणवीस यांनी दिलेत. यावेळी माजी महापौर संदीप जोशी, महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व संबंधित अधिकारी उपस्थित होते.