भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गडचिरोली : सरपण गोळा करण्यासाठी जंगलात गेलेल्या महिलेवर मुलीच्यासमोर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना आज, बुधवारी दुपारच्या सुमारास वाकडी जंगल परिसरात घडली. मंगलाबाई विठ्ठल बोळे (५५, रा. वाकडी ता.गडचिरोली) असे मृत महिलेचे नाव आहे. शहरापासून जवळच असलेल्या वाकडी जंगल परिसरात मंगलाबई आपली कन्या शीतल तीक्षण रोहनकर व अन्य काही महिलांसोबत कक्ष क्र. १७१ मध्ये सरपण गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. तेथे दाट झुडूपात वाघ दडून बसल्याची तिला खबर नव्हती. सरपण गोळा करण्यात मायलेकी व्यस्त असतानाच वाघाने मंगलाबाई यांच्यावर पाठीमागून हल्ला केला.
यानंतर त्या जोराने ओरडल्या. कन्या शीतल व इतर महिलांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली तेव्हा मंगलाबाई या वाघाशी झुंज देत होत्या. मात्र, वाघाने त्यांच्या गळ्यावर पंजाने हल्ला केला. रक्तस्त्राव होऊन त्या जागीच मृत्युमुखी पडल्या. यानंतर कन्या शीतलसह इतर महिलांनी आरडाओरड केल्याने वाघ पळून गेला. महिलांनी गावात येऊन माहिती दिल्यावर गावकºयांनी धाव घेतली. गडचिरोली वनविभागाचे अधिकारी तसेच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. नव्या वर्षातही हल्ल्याचे सत्र सुरुच असल्याने जिल्ह्यात मानव व वन्यजीव संघर्ष तीव्र झाल्याचे चित्र आहे.