
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : पंचायत समिती मोहाडी येथे लेखापाल (अकाऊंटंट) म्हणून कार्यरत असलेले अखिल पारधी यांना लाचलुचपत प्रकरणात विशेष न्यायालयाने निर्दोष घोषित केले आहे. विशेष न्यायाधीश भंडारा श्री. अतुल शाह यांनी नुकताच हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. तक्रारदार नरेश लिमजे यांनी आपल्या शेतातील धडक सिंचन योजनेअंतर्गत मंजूर विहिरींचे बिल काढण्यासाठी अखिल पारधी यांनी ५,००० लाचेची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत विभाग, भंडारा येथे केली होती. या तक्रारीच्या आधारे लाचलुचपत विभागाने पडताळणी करून सापळा कारवाई केली व पारधी यांना अटक केली. त्यानंतर संपूर्ण तपास करून आरोपपत्र भंडारा न्यायालयात सादर करण्यात आले.
सदर खटल्यात तक्रारदार, पंच साक्षीदार आणि नियुक्ती अधिकाºयांच्या साक्षी तपासण्यात आल्या. मात्र न्यायालयीन सुनावणीत पंच व तक्रारदार यांच्या साक्षींमध्ये तफावत आढळली. आरोपी व तक्रारदार यांच्यातील कथित लाच मागणीचे संभाषण पंचाने स्पष्टपणे ऐकले नसल्याचे समोर आले. तसेच संबंधित निधी मंजुरीचे काम हे आरोपीच्या कार्यक्षेत्रात येत नसल्याचेही न्यायालयाने नोंदवले. याशिवाय, आरोपपत्र दाखल करण्यासाठी देण्यात आलेली मंजुरी ही संबंधित अधिकाºयांनी कोणतीही शहानिशा न करता व सद्सद्विवेकबुद्धीचा वापर न करता दिल्याचा निष्कर्ष न्यायालयाने काढला. या सर्व बाबींचा विचार करून न्यायालयाने अखिल पारधी यांची निर्दोष सुटका केली. या प्रकरणात आरोपीच्या वतीने अॅड. राजेश राऊत, अॅड. सारंग राऊत आणि अॅड. निश्चय राऊत यांनी प्रभावी बाजू मांडली.