
सोलापुरः- आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्यावेळी म्हणजे २०२९ मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल पाहायला मिळतील. उद्धव ठाकरे हे पुन्हा भाजपसोबत जाऊ शकतात. तर सध्या सत्तेत असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपले सर्व शिलेदार घेऊन शरद पवार यांच्याशी युती करतील, असा खळबळजनक दावा ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी केला आहे. ते रविवारी सोलापूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी लक्ष्मण हाके यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारे दावे केले.
आगामी निवडणुकीत म्हणजे २०२९ मध्ये एकनाथ शिंदे, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष एका बाजूला असतील. तर भाजप आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना हे दोन पक्ष एकत्र येतील. राज ठाकरे यांच्यामहाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जनाधार उरलेला नाही. राज ठाकरे यांनी अनेकदा भूमिका बदलल्या आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांनी आणखी काही वर्षे तयारी करण्याची गरज आहे, असे मत लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केले. भाजपपासून दूर गेलेले उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा भाजपसोबत आल्याचे चित्र २०२९ मध्ये दिसेल असा खळबळजनक दावा हाके यांनी केला आहे. यामुळे महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघेल आणि ह्याची सुरुवात नुकत्याच झालेल्या पंचायत राज निवडणुकीत दिसल्याचे हाके यांचे सांगणे आहे.