
कल्याण : कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर रायते पुलाजवळ आज सकाळी भीषण अपघात घडला असून या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याची माहिती समोर आली आहे. काळीपिवळी प्रवासी वाहतूक करणारी एक लहान मोटारगाडी सिमेंट मिक्सर वाहनावर जोरात आदळल्याने हा अपघात घडला. या दुर्घटनेत घटनास्थळीच अकरा जणांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाल्याची पुष्टी पोलिसांनी केली आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये आठ पुरुष आणि तीन महिलांचा समावेश असून सर्वजण मुरबाड परिसरातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. प्राथमिक तपासानुसार, क्षमता कमी असलेल्या वाहनात मर्यादेपेक्षा जास्त प्रवासी बसवण्यात आले होते. सुमारे पाच आसनी वाहनात बारा जण प्रवास करत असल्याचे समोर आले असून त्यामुळे अपघाताची तीव्रता अधिक वाढल्याचे बोलले जात आहे.