
भंडारा : जिल्ह्यातील एका तरुणीचा चेन्नई येथे समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. सुट्टीच्या दिवशी समुद्रकिनारी फिरण्यासाठी गेलेल्या तरुणांच्या गटातील तीन जण प्रचंड लाटांमध्ये वाहून गेल्याची माहिती आहे. जिल्हा नियंत्रण कक्षाकडून प्राप्त माहितीनुसार, महाराष्ट्रातील १५ तरुण-तरुणी उङ्मॅल्ल्र९ंल्ल३ या आयटी कंपनीत इंटर्नशिपसाठी चेन्नई येथे गेले होते. दि. २१ फेब्रुवारी रोजी सुट्टी असल्याने सर्व जण पोडेंचेरी रोडवरील कांथाट्टूर पोलीस स्टेशन हद्दीतील गोल्डन बीच येथे फिरण्यासाठी गेले होते. यावेळी समुद्रात अचानक १० ते १५ फूट उंचीच्या लाटा उसळल्या.
सर्व जण सेल्फी घेत असताना एक मोठी लाट आल्याने तिघे जण समुद्रात वाहून गेले. स्थानिक पोलिसांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली असून आतापर्यंत एक मृतदेह हाती लागला आहे. मृत व्यक्तीची ओळख कु. मयुरी हरिश्चंद्र चौधरी (रा. वरठी, ता. मोहाडी, जि. भंडारा) अशी झाली आहे. या घटनेमुळे भंडारा जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. उर्वरित दोन तरुणांचा शोध सुरू असून स्थानिक प्रशासन आणि बचाव पथके घटनास्थळी कार्यरत आहेत. भंडारा जिल्हा प्रशासन तामिळनाडूतील स्थानिक प्रशासनाशी संपर्कात असून पीडित कुटुंबियांशी सातत्याने संवाद साधला जात आहे.