
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- बिलासपूर- गोंदिया-नागपूर रेल्वे मार्गावर असलेले भंडारा रोड रेल्वे स्थानक रेल्वे थांब्यांबाबत रेल्वे मंत्रालय आणि रेल्वे बोर्डाकडून सतत दुर्लक्षित राहिले आहे. भंडारा जिल्हा असूनही अनेक सुपरफास्ट गाड्या येथे थांबत नाहीत. यामुळे भंडारा जिल्हा रेलयात्री सेवा समितीने असंतोष व्यक्त केला आहे. बिलासपूर झोनमध्ये येत असलेल्या व अमृत भारत योजनेतंर्गत निवडण्यात आलेल्या भंडारा रोड रेल्वे स्टेशनवर अनेक सुपरफास्ट गाड्यांचा थांबा नाही. यामुळे रेल्वे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. या संदर्भात रेल यात्री सेवा समितीने रेल्वे मंत्री, दिल्ली रेल्वे बोर्डाचे विभागीयव्यवस्थापक नागपूर, विद्यमान खासदार, माजी खासदार, खासदार प्रफुल्ल पटेल आणि मंत्री नितीन गडकरी यांना अनेक विनंत्या सादर केल्या.
शिवाय, रेल यात्री सेवा समितीच्या एका शिष्टमंडळाने त्यांची प्रत्यक्ष भेट घेतली आणि त्यांना थांबादेण्याची विनंती केली. तरीही, कारवाई न झाल्याबद्दल समितीने नाराजी व्यक्त केली. या स्थानकावरून ४० हायस्पीड गाड्या जातात. यापैकी काही आवश्यक गाड्यांसाठी थांबे अपेक्षित आहेत. बिलासपूरहून निघणाऱ्या सर्व गाड्या, जसे की बिलासपूर-पुणे आणि इतर गाड्या, भाटापारा, दुर्ग, भिलाई, राजनांदगाव, डोंगरगड, गोंदिया आणि इतर रेल्वे स्थानकांवर थांबे देतात, परंतु या गाड्या भंडारा येथे थांबत नाहीत. भंडारा जिल्हा त्याच्या पितळ आणि तांदूळ उद्योगांसाठी प्रसिद्ध आहे. म्हणूनच,जिल्ह्याच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासासाठी, काही हाय-स्पीड गाड्यांना थांबे प्रदान करणे आवश्यक आहे, असे समितीचे सचिव प्रा. बबन मेश्राम म्हणाले.