
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवून देण्यात आल्याने अनेक शेतकरी आज अडचणीत आले आहेत. अशा शेतकºयांच्या धानाची विक्री थांबली आहे. उद्दिष्ट वाढवून देण्यात यावे आणि अन्य मागण्यांना घेऊन भारतीय किसान संघाच्या वतीने २७ फेब्रुवारी रोजी भंडारा शहरात मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती भारतीय किसान संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र पांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्हा धान उत्पादकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. याच हंगामाच्या जोरावर शेतकरी वर्षभराची व्यवस्था लावून ठेवतो. मात्र यावेळी ४० टक्के शेतकरी अजूनही ध्यान विकला जाईल या प्रतीक्षेत आहेत. खरीप हंगाम २०२५-२६ चे धान खरेदीचे उद्दिष्ट अपुरे पडले आहे. हे उद्दिष्ट वाढवून दिल्याशिवाय उर्वरित शेतकºयांच्या धान्याची खरेदी शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून केली जाऊ शकत नाही.
जवळपास ४० टक्के शेतकरी आज वाढीव उद्दिष्टाच्या प्रतीक्षेत आहेत. ३१ मार्च ही पीक कर्ज भरण्याची शेवटची तारीख असते. तोपर्यंत शेतकºयांच्या धनाची विक्री न झाल्यास त्यांच्यावर संकट कोसळू शकते. जिल्ह्याच्या धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवून देण्यात यावे, धानाचे उर्वरित चुकारे तत्काळ देण्यात यावे, धानाला २०००० रुपये हेक्टरी बोनस दिला जावा अशा अनेक मागण्यांना घेऊन भारतीय किसान संघाच्या वतीने २७ फेब्रुवारी रोजी भंडारा शहरात मोर्चा काढला जाणार आहे. शहरातील हुतात्मा स्मारक ते जिल्हाधिकारी कार्यालय चौकापर्यंत हा मोर्चा काढला जाणार असून त्यानंतर प्रशासनाला निवेदन दिले जाईल. या मोर्चात दोन हजाराहून अधिक शेतकरी सहभागी होती. सरपंच संघटना आणि आधारभूत धान खरेदी केंद्र संघटनेचा पाठिंबा असल्याचे यावेळी सुरेंद्र पांडे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला भारतीय किसान संघाचे जिल्हा मंत्री दिनेश कापगते, जिल्हा सहमंत्री ऋग्वेद येवले उपस्थित होते.