भंडारा पत्रिका / प्रतिनिधी आलापल्ली : मंगळवारी सकाळी ७ च्या सुमारास अहेरी आगारातून एटापल्लीमार्गे गडचिरोलीकडे निघालेल्या बसला ट्रकने जोरदार धडक दिल्याने अपघात झाला. सुदैवाने यात जीवितहानी झाली नसली तरी एसटी महामंडळाच्या बसचे मोठे नुकसान झाले आहे. यादरम्यान वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली होती. अहेरी-एटापल्ली-जारावंडी मार्गे गडचिरोलीकडे प्रवासी घेऊन जाणाºया एम. एच. ४० ए. क्यू. ६०९४ या क्रमांकाच्या बसला आलापल्लीएटापल्ली रस्त्यावर सुरजागडचा लोहखनिज घेऊन आष्टीकडे जाणाºया ओ. डी. ०९ जी. ०८५५ या क्रमांकाच्या ट्रकने धडक दिली. बसला धडक बसताच तेथील प्रवासी घाबरलेल्या अवस्थेत बाहेर पडले. अपघात होताच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली. माहिती मिळताच अहेरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल ठाकूर आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज बोण्डसे यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. सध्या एटापल्ली-आलापल्ली- आष्टी या मुख्य मार्गावर अपघात, वाहतूक कोंडी होणे हे नित्याचेच झाले आहे. त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. परिणामी सर्वसामान्य नागरिकांमधून रोष व्यक्त केला जात आहे. प्रशासनाने यावर त्वरित तोडगा काढावा, यासाठी आलापल्ली येथील व्यापारी संघटनेने याअगोदरच प्रशासनाला निवेदन दिले आहे. योग्य नियोजन आणि नियंत्रण नसल्याने दिवसेंदिवस अशा घटना घडत असल्याची ओरड सुरू आहे. या अपघातानंतर प्रशासन पुढे काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.