भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मूल : येथील रेल्वेस्थानक परिसरात प्रस्तावित होत असलेल्या मालधक्क्याच्या कामात झाडे तोडण्याची कोणतीही परवानगी नसताना दोन महिन्यांपूर्वी कर्मवीर महाविद्यालयाच्या पटांगणाला लागून असलेल्या असंख्य मौल्यवान वृक्षांची तोड करण्यात आली आणि आताही असंख्य वृक्षांची पुन्हा तोड होणार असून, ती त्वरित थांबविण्यात यावी व रेल्वे मालधक्का मूल शहरातून हद्दपार करण्यात यावा यासाठी तहसील कार्यालय मूल येथे पर्यावरणवादी युवक व विविध संघटनांनी मुकमोर्चा काढला. वृक्ष तोडीला तिव्र विरोध करून वृक्ष तोड थांबवावी आणि होत असलेला मालधक्का मुल नगरात होऊच देऊ नये यासाठी पुढील आंदोलन तीव्र होईल, असा इशारा देखील मूक मोर्चात सहभागी शेकडो आंदोलनकर्त्यांनी दिला व रेल्वे प्रशासनाविरोधात शंखनाद पुकारला.यावेळी रेल्वे प्रशासनाच्या विरोधात मूलवासीय जनता व युवकांचा आक्रोश दिसून आला. मूल येथील गांधी चौकात असलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला मार्लापण करून शांततेत मुकमोर्चा काढण्यात आला. यावेळी मालधक्का हटाव पर्यावरण बचाव, निसर्ग आपली माता, तिचे आपण रक्षणकर्ता, पर्यावरणाची सुरक्षा हीच आहे तपस्या यासह विविध घोषणा देत मोर्चाकरी तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार डॉ. रवींद्र होळी यांना निवेदन दिले. यावेळी उपस्थितांनी मूल शहरात मालधक्का नकोच याचा नगरवासियांतर्फे निषेध करण्यात आला. जोपर्यंत मालधक्याचे काम थांबत नाही, तोपर्यंत आंदोलनाची तीव्रता वाढतच राहील, असाही सूर आंदोलनकर्त्यांचा दिसून आला. मूल शहर विविध विकासकामाच्या माध्यमातून स्मार्ट सिटी बनले आहे. त्याला रेल्वे प्रशासनाने धक्का पोहोचवून हानी करू नये, अशी मागणीही करण्यात आली आहे. मालधक्का मूल येथे होऊ नये यासाठी माजी केंद्रीय गृहमंत्री हंसराज अहिर व महाराष्ट्र राज्याचे वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी संबंधित रेल्वे प्रशासनाला पत्र पाठवून पाठिंबा जाहीर केला आहे.