भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : शहरातील उत्तर – दक्षिण भागाला जोडणाºया रेल्वे मार्गावरील उड्डाणपुलाचे काम त्वरित पुर्ण करा, कुडवा लाईन परिसरातील पादचारी पूल सुरु करा तसेच शहरातील गंदगी व पिण्याच्या पाण्याची पूर्ती यासह विविध समस्यांना घेवून आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने माजी आ. राजेंद्र जैन यांच्या नेतृत्वात जनमोर्चा आंदोलन व मोटारसायकल रॅली काढून जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. गोंदिया-बालाघाट मार्गावरील रेल्वे उड्डाणपूल जीर्ण झाला असल्याने तो पूल पाडण्यात आला. त्यामुळे शहराचे दोन भागात विभाजन झाले असून रेलटोली परिसरातील नागरिकांना शहरात येण्यासाठी मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. तर कुडवा लाईन परिसरातील रेल्वेचा पादचारी पूल सुध्दा रेल्वे प्रशासनाने बंद केला आहे. त्यामुळे प्रवाशांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. नवीन उड्डाणपुलाचे काम अद्यापही सुरु करण्यात आले नसून शहरवासीयांची समस्या कायम आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसने अनेकदा पाठपुरावा व पत्र व्यवहार केला पण त्याची सुध्दा दखल घेण्यात आली नाही. कोरोना काळात बंद केलेल्या सर्व रेल्वे गाड्या पुर्ववत करण्यात याव्या.
सिंगलटोली रेल्वे चौकी जवळ अंडरग्राऊंड पूल तयार करण्यात यावे, रेल्वे गाड्या आऊटरवर थांबवू नये, भूमिगत गटार योजनेच्या कामामुळे शहरातील रस्त्यांची दुर्दशा झाली असून त्याची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी. मोक्षधाम परिसरातील केरकचºयाची त्वरित विल्हेवाट लावण्यात यावी, प्रधानमंत्री शहरी घरकुल योजनेचे थकीत हप्ते त्वरित देण्यात यावे.दिवाळीपुर्वी शहरातील केरकचरा साफ करण्यात यावा, शहरावासीयांना नियमित पाण्याचा पुरवठा करण्यात यावा, शहरातील स्ट्रीट लाईट सुरु करण्यात यावे यासह अन्य मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, रेल्वे स्टेशन व्यवस्थापकांना देण्यात आले. या समस्या त्वरित मार्गी न लावल्यास खासदार प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. या जनमोर्चा व मोटार सायकल रैली मध्ये माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर, देवेंद्रनाथ चौबे, वीरेंद्र जैस्वाल, अशोक सहारे, चुन्नी बेंद्रे, आशाताई पाटील, प्रेम जैस्वाल, केतन तुरकर, रफिक खान, विशाल शेंडे, सतीश देशमुख, सुनील भालेराव, विनीत शहारे, हेमंत पंधरे, मनोहर वालदे, राजू एन जैन, नानू मुदलियार, वेनेश्वर पंचबुद्धे, राजेश कापसे, खालिद पठाण, रवी मुदडा, सैय्यद इकबाल, शहरातील गणमान्य नागरिक, व्यापारीगन, विद्यार्थी सह असंख्य कार्यकर्ता व पदाधिकारी सहभागी झाले.