भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : विदर्भाच्या औद्योगिक विकासाला गती देण्याची क्षमता असलेला भंडारा जिल्ह्यातील भारत हेवी इलेक्ट्रीकल्स लि.(भेल) प्रकल्प सत्तांतरानंतर रखडला आहे. या प्रकल्पाच्या नावावर साकोली तालुक्यातील सुमारे ४५० एकर भूसंपादन आणि संरक्षक भिंत सोडले तर गेल्या नऊ वर्षांत काहीच झाले नाही. २०१३ मध्ये भेल प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली. परंतु सत्ता पालट होताच या प्रकल्पाचे ग्रह फीरले. या प्रकल्पावर भूसंपादन आणि इतर किरकोळ कामासाठी सुमारे ५०० कोटी रुपये खर्च झाले आहेत. आता प्रकल्पाची कुठेच चर्चा नसून भंडारा जिल्ह्यातील या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा जन्मापूर्वीच मृत्यू झाल्यासारखी अवस्था झाली आहे. प्रकल्पसाठी अधिग्रहित केलेल्या जमिनीवर गवत वाढले असून परिसरातील नागरिक त्याचा चराईसाठी वापर करीत आहेत. या प्रकल्पात पहिल्या टप्प्यात २७३१ कोटी रुपयेगुंतवणूक अपेक्षित होती. या प्रकल्पामुळे परिसरात लघु उद्योगांना चालना मिळेल आणि सुमारे ३० हजारनागरिकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा अंदाज होता व या प्रकल्पाला कच्चा माल देणारे लहान मोठे कारखाने जवळपास येनार होते. त्यासाठी मुंडीपार आणि बामनी खैरी येथेशेतकºयांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या. त्यांनाही रोजगार देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. येथे २४० मेगावॅट सोलर फोटो व्होल्टिक सेल्स आणि १०० मेगावॅट फोटो मोडूल्सची निर्मिती करण्यात येणार होती. प्रारंभी ४०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून फॅब्रिकेशनच्या कामाला सुरुवात केली जाईल आणि त्यानंतर पीव्ही सेल प्लॉन्ट सुरू होईल, असे प्रस्तावित होते. पण, केंद्रातील सत्ता बदलल्या नंतर या प्रकल्पाकडे दुर्लक्ष झाले आहे. आता स्थानिक आणि परिसरातील सुशिक्षित बेरोजगार रोजगाराच्या शोधात परराज्यात पलायन करीत बेरोजगारी मुळे गुन्हेगारीत वाढ होत आहे. वय पस्तीस गाठत आहे. हाताशी काम नसल्यामुळे पोट कसे भरावे, प्रपंच कसा चालवावा हा प्रश्न निर्माण झाला आहे. महाराष्ट्रात काही प्रकल्प सुरू झाले नाही आणि काही प्रकल्प बाहेर जात आहेत. अश्यात सुशिक्षित बेरोजगारांचे काय? सरकारने या प्रकल्पाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.