तालुका प्रतिनिधी मोहाडी : पोलीस ठाणे मोहाडी हद्दीत येणाºया सुकळी येथील एका विधवा महिलेला काही लोक आठ, नऊ वर्षांपासून शेतावर जाण्यास मज्जाव करून शिवीगाळ व मारहाण करीत असल्याने त्या महिलेला पीक घेता येत नाही व शेती पडीक ठेवावी लागत असल्याने जाण्यायेण्याचा मार्ग मोकळा करून द्यावा अशी मागणी त्या महिलेने आयोजित वार्ताहर परिषदेतुन केली आहे. सुकळी येथे छाया जयदेव बानेवार या विधवा महिलेची ०.६१ हे.आर. शेती असून या शेतीवर जाण्यायेण्यासाठी पूवीर्पासून श्रीराम कनपटे, कैलास कनपटे यांच्या शेतातून रस्ता आहे. परंतु कनपटे परिवारातील लोकांनी रस्ता बंद करून तेथे पिकाची लागवड करीत आहेत. व शेतातून जाण्यास मज्जाव करीत असल्याने मला अनेक वर्षांपासून शेती करता येत नाही. उपविभागीय अधिकारी तुमसर यांनी ०५ जून २०१७ रोजी गैर अर्जदार नानाजी कनपटे, श्रीराम कनपटे यांनी हंगामी वहिवाटी रस्ता मोकळा करून द्यावा, बैलबंडी, नांगर, वखर नेऊ द्यावा, अडथळा करू नये असा आदेश पारित केला होता. परंतु या आदेशाला न जुमानता गैरअर्जदारांनी रस्ता मोकळा करण्या ऐवजी छाया बानेवार यांचे शेतावर पायी जाणे येणे सुद्धा बंद केले. गवत आणण्यासाठी पायी शेतावर जातांना मी महिला असतांनाही मारहाण करून हाकलून लावण्यात येत आहे. याची तक्रारही मोहाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. परंतु पोलिसही मदत करायला तयार नाहीत. उलट ती शेती त्यांनाच विकून या, त्रासापासून मुक्त व्हा, व दुसरीकडे शेती घ्या असा सल्ला दिला. मी एकटी व विधवा बाई असल्याने गैरअर्जदार मला त्रास देऊन शेती विकण्यास व भूमिहीन करण्यास भाग पाडत आहेत. माज्या शेतावर जाण्यासाठी जर रस्ताच नसेल तर मी शेती करू कशी, शेती असूनही अनेक वर्षांपासून एक दाना त्या शेतातून घरी आणलेला नाही. कृपया कोणीतरी मला मदद करा हो, अशी आर्त हाक त्या विधवा महिलेने येथे वार्ताहर परिषदेतून केली आहे.