भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : कत्तलखान्याकडे घेऊन जाण्यासाठी सालेकसा तालुक्यातील पानगाव व कहाली दरम्यान जंगलात गटागटात ठेवलेल्या १४० गोवंशाची सालेकसा पोलिसांनी सुटका केली. ही कारवाई २ जानेवारी रात्री १२.३० ते ३जानेवारी सकाळी ९ वाजतादरम्यान करण्यात आली. सालेकसा पोलिस ठाणे हद्दीत सीमावर्ती, नक्षलग्रस्त, जंगल भागाचा फायदा घेऊन मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यात गोवंशाची तस्करी नवीन नाही. सालेकसा तालुक्यातील घटदाट जंगलातून रात्रीच्या वेळेस कळपाकळपाने व मोठ्यासंख्येने जनावरे कत्तलीसाठी नेली जात असल्याचे अनेकदा समोर आले आहे. यासाठी जिल्हा पोलिस विभाग वेळोवेळी गस्तीसह गोपनीय माहिती मिळवित असते. यातंर्गत सालेकसा पोलिसांची याविरोधात विशेष धाड मोहिम सुरु आहे.
२ जानेवारी रोजीाालुक्यातील कहाली व पानगाव या गावादरम्यान असलेल्या जंगलात १० ते १२ संख्येत १५ ते २० गटात जनावरांना चारापाण्याची व्यवस्था न करता ठेवले असून त्यांना छत्तीसगड व मध्यप्रदेशात कत्तलखान्याकडे नेत असल्याची गोपनीय माहिती सालेकसा पोलिसांना मिळाली.
या माहितीच्या आधारे सालेकसाचे ठाणेदार जनार्दन हेगडकर यांनी आपल्या चमुसह रात्री १२.३० वाजता ते ३ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजतापर्यंत कहाली ते पानगाव जंगलात शोध मोहिम राबवून ठिकठिकाणी व गटात बांधलेली १४० गौवंशाची जनावरांची सुटका केली. या जनावरांना गौशाळेत पाठविण्यात आलेआहे. याप्रकरणी सालेकसा पोलिस ठाण्यात कलम ५ (अ) (२), ५ (ब), ६ महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा सहकलम ११ (च) (ज) (झ) प्राण्यांना निर्दयतेणे वागविण्यास प्रतिबंध कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या आदेशान्वये अपर पोलिस अधीक्षक अशोक बनकर व आमगाव उपविभागीय पोलिस अधिकारी विजय भिसे यांच्या मार्गदर्शनात सालेकसाचे ठाणेदार जनार्दन हेगडकर यांच्या नेतृत्वात पोउपनि मुंडे, सफौ चौबे, नापोशि निमजे, अग्निहोत्री, पोशि अजय इंगळे, सुजित बनसोड आदींनी केली.