भंडारा पत्रिका / प्रतिनिधी चंद्रपूर : बैलगाडीने शेतातून कापूस आणताना अचानक रानडुकरांचा कळप समोर आला. रानडुकरांना पाहून बैल सैरावैरा पळू लागले. यामुळे तरुण शेतकरी बैलगाडीवरून खाली कोसळला अन् बैलगाडीचे चाक छातीवरून गेल्याने तो गंभीर जखमी झाला. उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. ही दुदैवी घटना गोंडपिपरी तालुक्यातील नवेगाव वाघाडे येथे घडली. तुषार वांढरे (३२) असे मृत तरुण शेतकºयाचे नाव आहे. तुषार वांढरे याची नवेगाव वाघाडे येथे शेती आहे. कापूस आणण्यासाठी तो शेतात गेला होता. बैलगाडीत कापूस भरून तो घरी निघाला. दरम्यानच्या मार्गावरून रानडुकरांचा कळप बैलगाडीसमोर आला. यामुळे बैल सैरावैरा पळू लागले. त्यामुळे तुषार हा बैलगाडीवरून खाली कोसळला. बैलगाडीचे चाक त्याच्या छातीवरून गेल्याने तो गंभीर जखमी झाला. गोंडपिपरीच्या ग्रामीण रूग्णालयात त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर झाल्याने चंद्रपूरला येथील रूग्णालयात नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. रानडुकरांच्या हैदोसाने येथील शेतकरी प्रचंड त्रस्त आहेत. अशातच ही घटना घडल्यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप आहे. तुषारच्या कुटुंबीयांना वनविभागाने तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी केली जात आहे.