भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : शासनाचे दुर्लक्ष व वेळकाढू धोरणामुळे जिल्ह्यातील आठ गावांचा मध्यप्रदेशात विलीनीकरण करावे, अशी मागणी आमगाव नगर परिषद क्षेत्रातील नागरिकांनी केली आहे. यात आमगाव, बनगाव, किडंगीपार, माल्ही, पदमपुर, कुंभारटोली, बिरसी, रिसामा ही गोंदिया जिल्ह्यातील आठ गावे त्यांचे विलीनीकरण सीमावर्ती राज्य मध्यप्रदेश येथे करावे या मागणीसाठी आज सोमवार २७ फेब्रुवारी रोजी येथील नागरिकांनी तहसील कार्यालय गाठून निवेदन सादर केले. सदर आठ गावातील लोकसंख्या जवळपास ४० हजार असून त्यांचे राज्य सीमावर्ती भाग हा मध्यप्रदेश राज्याला लागून आहे. महाराष्ट्र सरकारने मागील आठ वर्षांपासून नगर पंचायत ते नगरपरिषद स्थापनेचा वाद निर्माण करून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून प्रकरण न्यायप्रविष्ट ठेवले आहे.
सदर न्याय प्रविष्ट प्रकरणामुळे राज्य सरकारने प्रशासक कारभार सुरू ठेवला आहे. यामुळे २०१४ नंतर याठिकाणी सार्वत्रिक निवडणूक झाली नाही. लोकप्रतिनिधी निवडणूक झाली नसल्याने व योजना विकास निधी मंजूर करण्यात आले नाही. त्यामुळे या भागाचा विकास झाला नाही. येथील भौगोलिक परिस्थिती पाहता या ठिकाणी महाराष्ट्र राज्य सरकारने मागील १३ वर्षांपासून या ठिकाणी राज्य व केंद्र सरकारच्या योजना बंद करून नागरिकांना मूलभूत विकासापासून रोखले आहे. या आठ गावांना मध्यप्रदेश राज्यात विलीनीकरण करून राज्य व केंद्र सरकारच्या योजनांची अंमलबजावणी करून विकास करावा अथवा केंद्रशासित भाग घोषित करावा, अशी मागणी आमगाव नगर परिषद संघर्ष समितीने केली आहे. यावेळी समितीचे रवी क्षीरसागर, यशवंत मानकर, संजय बहेकार, उत्तम नंदेश्वर, रितेश चुटे, भोला गुप्ता, मुन्ना गवळी, विजय नागपुरे, महेश उके, राहुल चुटे, प्रभादेवी उपराडे, बाळू वंजारी, पिंकेश शेंडे, राधाकिसन चुटे, इकबाल पठाण आदी कार्यकर्ते उपस्थित होते