भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा: वैनाकाठ फाऊंडेशन भंडा-याच्या वतीने साहित्य, संस्कृती, सामाजिक व शिक्षण क्षेत्रातील राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली. युगसंवाद साहित्य व सांस्कृतिक चळवळ भंडारा अंतर्गत वैनाकाठ फाऊंडेशन भंडारा तर्फे वर्ष २०२१२०२२ चे साहित्य, सामाजिक आणि शिक्षण क्षेत्रातील पुरस्कार पुढील प्रमाणे जाहीर करण्यात आले आहेत. यात मुकुंदराज काव्य पुरस्कार ‘आडतासाच्या कविता’ श्रीकांत ढेरंगे, संगमनेर टिंब प्रकाशन वडाळा, मुंबई, घनश्याम डोंगरे कथा पुरस्कार ‘रज्जुत मज्जा’ स्वप्निल चव्हाण, कल्याण शोधक प्रकाशन, कल्याण, ना.रा.शेंडे कादंबरी पुरस्कार ‘ते पन्नास दिवस’ पवन भगत,बल्लारशाह मैत्री प्रकाशन, पुणे नांदेड, डॉ.अनिल नितनवरे समीक्षा पुरस्कार ‘प्रकाश किनगावकर यांची कविता’ डॉ.संजय बोरुडे, अहमदनगर साहित्याक्षर प्रकाशन, संगमनेर, डॉ.आंबेडकर वैचारिक ग्रंथ पुरस्कार ‘विवाहसंस्था’ अनुराधा नेरूरकर, मुंबई ग्रंथाली प्रकाशन, मुंबई, महात्मा कालिचरण नंदागवळी समाजमित्र पुरस्कार देवाजी तोफा, प्रसिद्ध समाजसेवी, (लेखा मेंढा) जिल्हागडचिरोली, जे.पी.नाईक शिक्षणमित्र पुरस्कार प्रवीण निकम,फलटण हल्ली मुक्काम पुणे यांना जाहीर करण्यात आले आहेत.
वाङ्मय क्षेत्रातील पुरस्कार प्राप्त ग्रंथ निवडीचे कार्य डॉ.गिरीश सपाटे, प्रा.डॉ.सुरेश खोब्रागडे, प्रा.भगवंत शोभणे, प्रा.डॉ.रेणुकादास उबाळे, अमृत बन्सोड, प्रमोदकुमार अणेराव या तज्ज्ञ समितीने केले. सर्व पुरस्काराचे स्वरूप ५००० रुपये रोख, मानपत्र, सन्मानचिन्ह या स्वरुपाचे आहे. पुरस्कार वितरण सोहळा १६ एप्रिल २०२३ला ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉ.यशवंत मनोहर यांच्या हस्ते आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे, असे वैनाकाठ फाऊंडेशनचे सचिव विवेक कापगते यांनी कळविले आहे.