भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : उमरेड -पवनी क-हाडला विस्तारित अभ्यारण्यातील गावांचे पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव शासनाकडे मागील ५ वर्षांपासून प्रलंबित आहे. पवनी तालुक्यातील पाऊनगाव, चीचखेडा, मुरमाडी व रिठी गावे आवळगाव, धामणगाव, कवडसी, गायडोंगरी, जोगीखेडा, हिमेशा, ह्या गावांचा पुनर्वसन करणे आवश्यक आहे. ही गावे अभ्यारण्याच्या आत येत असल्याने ह्या गावांवर जंगली जनावरांचा उद्रेक, शेतातील पिकांचे नुकसान, पाळीवप्राण्यांचे नुकसान, येण्या जाण्याच्या रस्त्यांवर वाघांचे दररोज वास्तव्य असल्याने ५ ते १२ वी चे विद्यार्थ्याना शिक्षणापासून मुकावे लागले आहे. गावक-यांना दररोज जीव मुठीत धरून जगावे लागते. सदर गावांचा पुनर्वसन करावयाचा असल्याने शासनाकडून ह्या गावांमध्ये कोणतेच विकासाचे कामे घेता येत नाही. रोहयोचे कामे सुद्धा घेता येत नाही. त्यामुळे सदर गावातील मजुरांना कामे उपलब्ध नाही, अभयारण्यात गावे आल्याने शेतकºयांना जंगली जनावरांमुळे शेतात पिके घेता येत नाही. त्यामुळे सदर गावातील मजूर व शेतक-यांवर उपासमारीची पाळी आलेली आहे. अशा विवंचनेत सापडलेल्या मजूर व शेतक-यांसाठीत्यांचे पुनर्वसन होई पर्यंत त्यांचे गावात रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी भाजपा किसान मोर्चा चे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार शिशुपाल पटले यांनी दि.४ मे गुरुवार ला मंत्रालयात राज्याचे वन व महसूल विभागाचे प्रधान सचिव मा.वेणूगोपाल रेड्डी यांची त्याचे कार्यालयात भेट घेऊन केली.
विषयाचे गांभीर्य पाहून त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश राज्याचे प्रधान सचिव मा.वेणूगोपाल रेड्डी यांनी नागपूरचे पीसीसीएफ व सीसीएफ यांना दिले आहेत.