भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ९ ते ३० आॅगस्टदरम्यान सर्व पंचायत समिती आणि ब्लॉकस्तरावर ‘मेरी मिट्टी – मेरा देश’ या विषयावर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाची सांगता दिल्लीच्या कर्तव्य पथावर होणार आहे. कार्यक्रमासाठी भंडारा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून नेहरू युवा केंद्राच्या एका प्रतिनीधीव्दारे माती गोळा केली जाणार असून ही माती एकत्रित करत एका कलशातून दिल्लीच्या कर्तव्य पथावर नेली जाणार आहे. तेथे प्रत्येक जिल्ह्यातून आलेल्या मातीतून ‘अमृतवाटिका’ बाग तयार केली जाणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे.
देशभरातून ७५०० युवक या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची माहिती जिल्हाधिका-यांनी दिली.आज जिल्हाधिकाºयांनी जिल्हा समन्वय समिती,सार्वजनिक उत्कृष्ट गणेश मंडळ पुरस्कार,तसेच स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत मेरी मिटटी ,मेरा देश या अभियानाबाबतचा आढावा घेतला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी लिना फलके यांच्यासह सर्व विभागप्रमुख हजर होते. ९ आॅगस्ट ते ३० आॅगस्टपर्यंत मेरी मिटटी,मेरा देश अभियान राबविण्यात येईल.यामध्ये १६ ते २५आॅगस्ट या कालावधीत ग्रामीण व शहरी भागात कार्यक्रम राबविण्यात येतील. नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक ब्लॉकस्तरावर जाऊन गावोगावी माती गोळा करुन ती २५ आॅगस्टपर्यंत ठराविक ठिकाणी जमा करणार व २७ आॅगस्टपर्यंत ही माती दिल्लीत कर्तव्यपथावर नेण्यात येणार त्यानंतर ३० आॅगस्टला कर्तव्य पथावर समारोप समारंभ होणार आहे.