भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी : कासवाला पकडण्याच्या मोहात दोन शेतमजूरांचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्रसंगी तेथे उपस्थित इतर शेतमजूर महिलांच्या धाडस व समयसूचकतेमुळे एका मजुराचे प्राण थोडक्यात बचावले. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील गडपेंढरी शेतशिवारात घडली. मंगेश जयगोपाल गोंधुळे (वय ४०) व दयाराम सोनीराम भोंडे (वय ३८) दोघेही राहणार मेंढा/भुगाव ता. लाखनी अशी मृतकांची नावे आहेत. तर सुधीर मोरेश्वर हजारे (वय ३५ असे प्राण वाचलेल्या युवकाचे नाव आहे. लाखनी तालुक्यातील गढपेंढरी येथील शेतकरी अशोक गायधने यांच्या शेतात लाखनी तालुक्यातील भुगाव/मेंढा येथील जवळपास पंधरा स्त्री-पुरुष गुता पद्धतीने रोवणीसाठीआले होते.
दरम्यान पेंढ्या फेकून झाल्याने तिघे पुरुष हे जवळच असलेल्या पडक्या विहारी जवळ गेले असता त्यांना विहिरीत त्यांना एक मोठा कासव दिसला. तो कासव काढण्याचा मोह या तिघांनाही आवरता आला नाही. मात्र विहरीचा वापर बंद असल्याने तिथे विषारी गॅस तयार झाली होती. त्यामुळे विहिरीत खाली उतरताच त्यांचा श्वास गुदमरू लागला. ओरडण्याचा त्यांचा आवाज येताच उपस्थित महिलांनी लगेच समय सूचकता दाखवत आणि धाडस करीत स्वत:च्या अंगावरच्या साडया काढून त्याचा दोर बनविला आणि तो विहिरीत सोडला. साडीच्या साह्याने बनविलेल्या दोराला पकडून सुधीर हजारे हा मजूर वर आला. मात्र मंगेश गोंधुळे आणि दयाराम भोंडे यांचा मृत्यू झाल्याने त्यांना वर काढण्यात महिला अपयशी ठरल्या.