भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी लोकसभा सचिवालयाने बहाल केल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारलेला आहेच पण देशातील जनतेच्याही आशा पल्लवित झालेल्या आहेत. देशात सध्या हुकूमशाही कारभार सुरु असून या तानाशाहीविरोधात इमानदारीने लढाणारा नेता अशी राहुल गांधी यांची प्रतिमा जनतेच्या मनात निर्माण झाली आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. राहुल गांधी यांची खासदारकी कायम केल्याच्या मुद्द्यावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, मा. सुप्रीम कोटार्ने शुक्रवारी राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती दिली, त्यानंतर सोमवारी लोकसभासचिवालयाने त्यांची खासदारकी बहाल केली. राहुल गांधी यांच्याविरोधात नियोजनबद्ध पद्धतीने षडयंत्र रचून खोट्या केसमध्ये अडवण्याचा प्रयत्न भाजपाने केला. कर्नाटकातील एका प्रचारसभेतील विधानावर सुरतच्या कोर्टात भाजपाचा स्थानिक नेता खोटी केस करतो व न्यायालय दोन वर्षांची शिक्षा ठोठावते, लगेच २४ तासाच्या आत राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली जाते व सरकारी निवासस्थानही सोडण्यास भाग पाडले जाते. हे सर्व राजकीय हेतूने करण्यात आले आहे. शेवटी मा. सुप्रीम कोटार्ने या शिक्षेला स्थगिती दिली, हे समाधानकारक असून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण होणे स्वाभाविक आहे.